![हवेचा दाब देतोय मान्सूनची वर्दी!](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F04%2FRain.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे : हवेचा दाब यंदा मान्सून लवकर येण्याची वर्दी देत आहे. यंदा प्रचंड उष्णतेच्या लाटांमुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्यामुळे हवेचा दाब मान्सूनच्या प्रगतीस अनुकूल झाला असून सध्या हा दाब 700 वरून 850 हेक्टा पास्कलवर गेल्याने मान्सूनच्या हालचालीचे संकेत मिळाले आहेत.
मान्सूनची हालचाल आणि नंतरची सर्व प्रगती ही हवेच्या दाबावर अवलंबून असते. हवेचा दाब हा समुद्रावर 1000 हेक्टा पास्कलवर गेला की मान्सूनची निर्मिती सुरू होते. हवेचा दाब 1006 वर गेला की, मान्सून अंदमानात दाखल होतो. पुढे हा दाब 1008 वर गेला की, तो भारतात केरळ किनारपट्टीवर येतो. यंदा हवेचा दाब मान्सूनसाठी लवकर अनुकूल होत आहे, असे निरीक्षण हवामान शास्त्रज्ञांनी केले आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार मान्सून अंदमानात येण्यास अवघे 21 दिवस उरले आहेत. दरवर्षी मान्सून 18 ते 20 मेदरम्यान अंदमानात येतो. त्यानंतर हवेचा दाब अनुकूल झाला तर यंदा वेळेआधीच तो केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी यंदा दिला आहे.
हवेच्या दाबाचे गणित असे हवेचा दाब हा हेक्टा पास्कल या एककात मोजला जातो. 25 एप्रिल रोजी हवेचा दाब 500 हेक्टा पास्कलवर होते. 28 एप्रिल रोजी ते 700 हेक्टा पास्कलवर गेले, तर 29 एप्रिल रोजी एकदम 850 हेक्टा पास्कल इतके झाले. हा दाब जेव्हा 1000 हेक्टा पास्कलवर जाईल, तेव्हा मान्सूनला वेग येईल. समुद्रावर जेव्हा हवेचे दाब 1006 वर जातील, तेव्हा तो अंदामानात दाखल होईल. हेच दाब 1008 वर गेले की, तो केरळमध्ये येतो. कारण समुद्रावर हवेच दाब वाढले की देशाच्या इतर भागांत ते कमी म्हणजे 1002 च्या आसपास असतात. ज्या दिशेने दाब कमी त्या दिशेने मान्सूनचे वारे भारतात येतात.