गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने अनपेक्षितपणे 5-जी स्पेक्ट्रम या वायूलहरीचा लिलाव जाहीर केला. स्पेक्ट्रमला भरपूर मागणी असल्यामुळे हा लिलाव 2-3 दिवस चालू होता. गेल्या दोन लिलावात 700 एम एच झेडला फारसा प्रतिसाद नव्हता. या स्पेक्ट्रमच्या लिलावात चिनी गुंतवणूकदारांना फारसे काही हाती लागले नाही. एअरटेल आणि जिओ यांनी भागीदारी करून ही संधी घेतली. व्होडाफोन व आयडिया या कंपन्या युरोपमधील कंपन्यांबरोबर 5-जी स्पेक्ट्रमबाबत बोलणी करीत आहेत. भारत आता या क्षेत्रातील अग्रणी महासत्ता होण्याचे स्वप्न बघत आहे.
सध्या पोलाद, बँकिंग, औषधी कंपन्या, सॉफ्टवेअर, रसायने, ऊर्जा, वाहननिर्मिती या क्षेत्रांतील मोठ्या व महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीला मोठा वाव आहे. डॉलर-रुपया विनिमयदर वाढल्यामुळे सॉफ्टवेअर या क्षेत्राला सोनेरी दिवस आले आहेत. 50 ते 60 टक्के कंपन्यांचा व्यवहार डॉलरमध्ये होतो.
ऑईल व गॅस, पोलाद, रसायने, औषधनिर्मिती, वस्त्रोद्योग या कंपन्यांमध्येही डोळसपूर्ण गुंतवणूक करावी.चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल- जूनअखेर) आयडीबीआय बँकेला 756 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. ही वाढ मागील वर्षाच्या या तिमाहीपेक्षा जवळजवळ 25 टक्के जास्त आहे.रिलायन्स जिओच्या पहिल्य तिमाहीच्या निव्वळ नफ्यात 24 टक्के वाढ होऊन तो 4335 कोटी रुपये झाला आहे. कंपनीला या तिमाहीच्या कामकाजात 21,873 कोटी रुपयांचा विक्री महसूल मिळाला आहे. जून 2021 च्या याच तिमाहीपेक्षा हा महसूल 21.5 टक्के अधिक आहे.
गेल्या आठवड्यात प्रत्येक दिवशी निर्देशांक थोड्या थोड्या प्रमाणात वाढत होता. ही एक सूचक गोष्ट समजायला हवी. बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील भरघोस कामगिरीमुळे निर्देशांक व निफ्टी दिन प्रतिदिन वाढत आहे. डॉलर-रुपयाचा विनिमय दर सतत वाढत आहे. ही वाढ अशीच चालू राहिली तर डॉलरचा भाव 90 रुपयांपर्यंत जाऊ शकेल.
भारतातील बहुतेक पोस्ट ऑफिसमधून आता प्राथमिक बँकिंगच्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही आता बँकिंगची सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहे. 'गाव तिथे बँक' असे चित्र आता अतिदूर विभागातही दिसते. त्यासाठी सुमारे 1.90 लाख पोस्टमन/पोस्ट वुमनना त्याचे प्रशिक्षण दिले जाऊन त्यानंतर नोकरीही दिली जाते. यामुळे देशातील बँकिंग सुविधात अडीचपट वाढ झाली आहे.
देशातील विज्ञापन तंत्रज्ञान (इन्फरमेशन टेक्नॉलॉजी) क्षेत्राची वाढ जोरदार, अकल्पनीय वेगाने झालेली आहे व होत राहील. हरितक्रांती व दुग्ध क्रांतीनंतर आता ही तंत्रज्ञान क्रांतीही देशाला समर्थ करीत आहे. 'रोटी कपडा और मकान' हे एकवेळचे स्वप्न होते. त्याच्या आता कितीतरी पुढे भारत गेला आहे. मागील आर्थिक वर्षातील सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (ॠीेीी ऊेाशीींळल झीेर्वीलीं) वाढ दुपटीने या क्षेत्राची वाढ होईल, असा अंदाज नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेसने (नॅसकॉम) केला आहे. त्यामुळे महसूलनिर्मिती व रोजगार निर्मितीचे महत्त्वाचे साधन म्हणून हे आयटी क्षेत्र होणार आहे.
आयटी क्षेत्राचा एकूण उद्योग 227 अब्ज डॉलरचा आहे. साडेचार लाख नव्या रोजगारांची निर्मिती झाली आहे. या क्षेत्रात एकूण 50 लाखांवर कर्मचारी आहेत. नव्याने भरती झालेल्या कर्मचार्यांमध्ये 44 टक्क्यांहून अधिक महिला कर्मचारी आहेत. एकूण महिला कर्मचार्यांची संख्या सुमारे 18 लाख आहे.
केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मिशनचा आयटी उद्योगाला खूप फायदा झाला आहे. टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, विप्रो आणि इन्फोसिस व एचसीएल टेक या आघाडीच्या चार कंपन्या 1.05 लाख नवीन रोजगार देण्याची शक्यता आहे. 40-45 वर्षांपूर्वी इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांनी ही अमूर्त जिंदगी असलेल्या या उद्योगाची पायाभरणी केली. सुरुवातीला 600 रुपये किमतीचे शेअर्स (समभाग) त्यांनी बाजारात आणले आणि त्यानंतर त्यांनी इतक्या प्रचंड प्रमाणात वर्षाआड बक्षीसभाग देऊन एका शेअरचे 125 शेअर्स करून अनेकांना मालामाल करून सोडले.
– डॉ. वसंत पटवर्धन