कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : पती-पत्नीचे नाते सात जन्म अखंड राहावे, यासाठी वटपौर्णिमेला सुवासिनींनी वडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले. यानिमित्त शहरातील विविध ठिकाणच्? या वटवृक्षांखाली सुवासिनींची गर्दी झाली होती. आख्यायिकेनुसार सत्यवान आणि सावित्रीच्या आयुष्यातील वटपौर्णिमेचा हा दिवस आधुनिक युगातही पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. मंगळवारी (दि. 14) जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी मनोभावे सौभाग्यवतींनी पूजा केली.
सौभाग्याचे लेणे लेवून जुन्या पिढीतील महिलांबरोबरच नवीन पिढीतील महिलाही जरी-काठाच्या साड्या नेसून पूजेचे तबक घेऊन वडाची पूजा उत्साहाने ठिकठिकाणी करताना दिसून आल्या.
पत्नीसोबत पतीनेही केले वडाचे पूजन
पत्नीप्रति प्रेमभाव, आदर, तिचा सन्मान आणि पती-पत्नी समानता दर्शवण्यासाठी, पत्नीला उदंड आयुष्य तसेच अविरत प्रेमासाठी जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी पतीने वडाच्या झाडाला सात फेर्या मारत ही आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी केली. दरम्यान, अंबाबाई मंदिरात कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी वटपौर्णिमा साजरी केली. यामध्ये नववधूंची संख्या अधिक होती. नऊवारी साडी, नाकात नथ, केसात गजरा अन् कपाळावर ठसठसीत कुंकू अशा पारंपरिक वेशभूषेत महिलांनी गर्दी केली होती.