राज्यातील शाळा तेरा जूनपासूनच

राज्यातील शाळा तेरा जूनपासूनच
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : कोरोनामुळे गेली दोन शैक्षणिक वर्षे वाया गेल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे येणारे वर्षही वाया जाऊ नये म्हणून आवश्यक ती सर्व काळजी घेऊन 13 जूनपासून शाळा सुरू करण्यात येतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी दिली. शाळांसाठी लवकरच कोरोना नियमावली लागू केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू होणार का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र दोन शैक्षणिक वर्षे वाया गेल्याने यंदा शाळा वेळेवर सुरू करण्याची भूमिका शिक्षणमंत्री गायकवाड यांनी घेतली आहे. 13 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शाळांमध्ये मास्कसक्ती करायची की नाही, याचा निर्णय काही दिवसांत घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. त्या म्हणाल्या, गेली दोन वर्षे कोरोनामुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. काही मुले तर शाळेत न जाता पुढे गेली आहेत. त्यामुळे हे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे आवश्यक काळजी घेऊन शाळा सुरू करू.

कोरोना नियम पुन्हा लागणार?

राज्य सरकारने गेल्या वर्षी काही नियमावली लागू करून अखेरच्या सत्रात शाळा सुरू केल्या होत्या. शाळेत एकावेळी एका वर्गात किती विद्यार्थी बसवायचे, याचे बंधन घालण्यात आले होते. मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे याचबरोबर पालकांकडून उपस्थितीबाबत परवानगी पत्र भरून घेण्यात आले होते. शिक्षकांना कोरोना चाचणी करून घेणे सक्तीचे करण्यात आले होते. त्यामुळे असे काही नियम लागू करून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news