मुंबई; चंदन शिरवाळे : केंद्र सरकारच्या पीएम श्री योजनेअंतर्गत राज्यातील जुन्या शाळांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार असून मंगळवारी होणार्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 सप्टेंबर 2022 रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून 'प्रधानमंत्री स्कुल्स फॉर रायझिंग इंडिया' (पीएम श्री ) या योजनेची घोषणा केली होती. या योजनेत देशभरातील 14 हजार 500 शाळांचे अद्ययावतीकरण आणि अनेक नव्या शाळांची निर्मिती केली जाणार आहे. या सर्व शाळा केंद्र सरकारच्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार तयार केल्या जातील.
या योजनेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशच्या शाळांचा समावेश असून त्यामध्ये आता आधुनिक शिक्षणासह संशोधनावर भर दिला जाणार आहे. शिक्षणासाठी सोयीस्कर पद्धती तसेच आधुनिक पायाभूत सुविधा आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, विद्यार्थ्यांचा मनावरील भार हलका होण्यासाठी स्मार्ट क्लासरुम आणि खेळही शिकविले जाणार आहेत.
पर्यावरणपूरक शाळा बनविण्यासाठी पाणी संवर्धन, कचरा पुनर्वापर, ऊर्जा-कार्यक्षम पायाभूत सुविधा इत्यादी गोष्टींचा अवलंब केला जाईल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार 60 तर राज्य सरकार खर्चाचा 40 टक्के भार उचलणार आहे.