मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईवर लादण्यात आलेले सर्व निर्बंध हटवून, फेब्रुवारी अखेरपर्यंत संपूर्ण शहर अन्लॉक होईल, असे स्पष्ट संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्याही घटू लागली असून फेब्रुवारी अखेरपर्यंत 100% मुंबईकरांचे लसीकरण होईल. त्यामुळे सध्या 50 टक्के क्षमतेने सुरू असलेले हॉटेल, रेस्टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय कोरोना स्थितीनुसार होऊ शकतो. म्हणजे मुंबई शहर 100 टक्के अन्लॉक होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले.
मुंबईत पहिला डोस 100 टक्के पूर्ण झाला आहे. तर दुसरा डोस 96 टक्के पूर्ण झाला आहे. सर्व गटातील सुमारे 92 लाख नागरिकांचे लसीकरण आठवडाभरात पूर्ण होईल. तर 15 ते 18 वर्षे वयोगटातील 9 लाख नागरिकांपैकी सुमारे 3 लाख जणांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. असे असले तरी अर्थात अन्लॉक बाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचेही वरिष्ठ अधिकार्यांनी स्पष्ट केले.
काय अन्लॉक होऊ शकते?
हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, थीम पार्क, स्विमिंग पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी
हॉटेल पूर्वीप्रमाणे रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
सांस्कृतिक कार्यक्रम, भजने आणि इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांना परवानगी
लग्नसमारंभासाठी 200 जण उपस्थित राहण्याची मर्यादा हटवणार