इंदूर, वृत्तसंस्था : भाजप माझी प्रतिमा खराब करण्यासाठी करोडो रुपये खर्च करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. भारत जोडो यात्रा इंदूरमध्ये पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
ते म्हणाले, भाजप माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असले तरी त्याचा फायदा मलाच होणार आहे. तुम्ही ज्यावेळी एखाद्या मोठ्या शक्तीबरोबर लढत असता, त्यावेळी वैयक्तिक टीका-टिप्पणी केलीच जाते. मला वाटते, मी योग्यप्रकारे काम करत आहे. टीकेतून खूप काही शिकायला मिळते. सत्य कधीच लपत नाही. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार हळूहळू समजून घेत आहे. लढत असताना समोरच्या व्यक्तीलाही समजून घ्यायला हवे, असे मला वाढते. माझी लढाई सत्यासाठी असून सत्याला कोणीच हरवू शकत नाही. माझ्याजवळ एक राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची व्यक्ती आली. मी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा कार्यकर्ता असून मी तुमचे स्वागत करतो, असे ते म्हणाले. मी त्यांचे स्वागत केले, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.
गेहलोत-पायलट यांच्यातील तणाव निवळेल
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील संघर्षाचा भारत जोडो यात्रेवर काहीच परिणाम होणार नाही. दोघेही आमचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्यातील तणाव लवकरच निवळेल, असेही राहुल गांधी यांनी यावेळी नमूद केले.