सोलापूर, संतोष सिरसट : 'तीळगूळ घ्या, गोड गोड बोला' असे म्हणत आपण राज्यात मकर संक्रांत-भोगी हा सण साजरा करतो. इंग्रजी महिन्याच्या सुरुवातीलाच हा सण आल्याने पुढील वर्षभर एकमेकांशी प्रेमाने वागण्याचा संदेश या माध्यमातून दिला जातो. या सणालाच आता राज्याच्या कृषी विभागाने पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे या सणाची 'तीळगूळ घ्या गोड गोड बोला' याबरोबरच पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणूनही नवीन ओळख तयार होणार आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषी विभागाने जानेवारी महिन्यात साजर्या होणार्या मकरसंक्रांत-भोगी या सणालाच पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.
पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने कृषी विभागाने प्रत्येक महिन्याचे नियोजन केले आहे. त्यांच्या नियोजनानुसार जानेवारी महिन्यात येणारी मकरसंक्रांत-भोगी हा महिलांचा सण पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. राज्यामध्ये मकरसंक्रांत-भोगी या सणाच्या दिवशी आहारामध्ये पौष्टिक तृणधान्य घेण्याची रूढ-परंपरा चालत आली आहे. या वर्षाचे औचित्य साधत या परंपरेचा आधार घेऊन पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व आधोरेखित करण्यासाठी हा दिवस दरवर्षी राज्यामध्ये पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.
राज्यात अनेक दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरे केले जातात. ते दिवस साजरे करण्यासाठी शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालयांना सांगितले जाते. शासनाच्या आदेशानुसार शाळा-महाविद्यालये, कार्यालये हे दिवस साजरे करत असतात. त्याची तंतोतंत अंमलबजावणी किती होते हा संशोधनाचा विषय आहे.
त्या विभागांना दिल्या सूचना
राज्यातील ज्या-ज्या विभागाकडून बालके, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार व कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी यांना विविध योजनेंतर्गत उपहारगृहातून फराळ, माध्यान्ह भोजन-भोजन पुरविण्यात येते. अशा सर्व विभागांनी मकरसंक्रांत-भोगी या दिवशी आहारामध्ये पौष्टिक तृणधान्यांचा जाणीवपूर्वक वापर करावा, अशा सूचनाही या दिवसाच्या निमित्ताने देण्यात आल्या आहेत.