![बोगस नोकरभरती रॅकेटच्या मुलाखती झाल्या चक्क मंत्रालयात?](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F05%2F%E0%A5%A7%E0%A5%AA-3.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मंत्रालयातील एका कर्मचाऱ्याकडून लिपिक पदी नोकरी देण्याच्या आमिषाने प्रत्येकी ०६ ते १० लाख रुपये घेऊन फसवणुक सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बोगस नोकर भरती रॅकेटच्या आमिषाला बळी पडलेले १० पीडित समोर आले असून याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात महेंद्र सकपाळ, महादेव शिरवाळे, सचिन डोळस व नितीन कुंडलिक या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालाडचा रहिवासी सागर जाधव या २६ वर्षीय तरुणाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्याच्या वडिलांच्या मित्राकडून त्यांची आरोपी सकपाळी ओळख झाली. सकपाळने त्याच्या ओळखीचे वरिष्ठ अधिकारी नितीन साठे याच्या ओळखीने पैसे देऊन मंत्रालयात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. जाधव कुटुंबाने सुरुवातीला ३ जणांचे ९ लाख रुपये भरले. जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीही झाली. नियुक्ती पत्रासाठी रीतसर पेपर काढलेले दाखवले गेले. मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागातील एका केबिनमध्ये मुलाखती पार पडल्या. लवकरच विभाग प्रमुखांची सही घेऊन रुजूपत्र, आय. डी. कार्ड आणि किट देण्यात येईल असे सांगून मंत्रालयात बोलावून घेत उर्वरित ६ लाख रुपये घेण्यात आले. नंतरही आणखी २ लाख उकळले.
पैसे भरूनही नोकरी मिळाली नसल्याने केलेल्या चौकशीमध्ये या टोळीने आणखीन काही जणांकडून नोकरीसाठी पैसे घेतल्याचे समोर आले. फसल्या गेलेल्या तरुणांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर हा बोगस नोकर भरतीचे भांडे फुटले. आता गुन्हे शाखा याप्रकरणी अधिक तपास करत आहे.