आवडत्या मंत्र्याकडे पोस्टींग मिळावी यासाठी तब्बल 200 कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम मोजणे, शेतकर्यांकडून जमिनी खरेदी करून उद्योजकांना सरकारकडून त्या जमिनींची मंजुरी मिळवून देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करणे, अशा प्रकारे तब्बल 1050 कोटी रुपयांच्या अधिकारी, दलाल आणि उद्योजकांच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश प्राप्तिकर विभाग च्या माध्यमातून करण्यात आला आहे.
गेल्या 6 महिन्यांपासून राज्यात विविध ठिकाणी छापेमारी सुरू असून यातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या छापेमारीत प्राप्तिकर विभाग मार्फत 25 निवासी तसेच 15 कार्यालयांवर छापे टाकले. तर 4 कार्यालयांवर वॉच ठेवण्यात आला आहे. या कारवाईत विविध प्रकारचे डिजिटल पुरावे तसेच वित्तीय व्यवहाराची महत्वपुर्ण कागदपत्रे हाती लागली असून टप्प्याटप्प्याने याबाबतची आणखी माहिती समोर येणार आहे.
डिजिटल डाटा, मोबाईल फोन, पेनड्राईव्ह, हार्ड ड्राईव्ह, आयक्लाऊड, ई-मेल्स इत्यादी डिजिटल पुरावे हाती लागले असून त्यांची पडताळणी सुरू आहे.
पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी आंगडीयांचाही वापर करण्यात येत होता. छापेमारीदरम्यान, एका आंगडीयाकडून प्राप्तिकर विभागाने 1.50 कोटी रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली.