पचनशक्‍ती मंदावलीय ?

पचनशक्‍ती मंदावलीय ?
Published on
Updated on

अनेकजण आपल्या आहारावर काळजीपूर्वक नियंत्रण ठेवत असतात. तसेच नियमित व्यायामही करत असतात. एवढे करूनही या मंडळींचे वजन काही केल्या कमी होत नाही. व्यायाम करूनही व संतुलित आहार घेऊनही वजन कमी होत नसेल तर अशा व्यक्‍तीची पचनशक्‍ती मंदावली असण्याची शक्यता असते. पचनशक्‍ती मंदावल्यामुळे अन्‍नाचे रूपांतर ऊर्जेमध्ये न होता चरबीमध्ये होते. आरोग्याचा विचार करताना पचनक्रियेला अत्यंत महत्त्व असते. आपण जो आहार घेत असतो, त्या आहाराचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचे काम पचनशक्‍तीद्वारे केले जाते.

पचनशक्‍ती मंदावली तर शरीरातील इन्सुलिन ग्रहण करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे कमी वयातच शरीर स्थूल होणे, थकवा येणे, उच्च रक्‍तदाब, मधुमेह यांसारख्या व्याधी आपल्या पाठीमागे लागतात. यामुळे आपली पचनशक्‍ती ठिकठाक करण्याकडे आवर्जुन लक्ष देणे आवश्यक असते. अनेक जण संतुलित आहार घेत असतात. तसेच नियमित व्यायामही करत असतात. तरीही त्यांचे वजन कमी होत नाही. अशा व्यक्‍तींची पचनशक्‍ती मंदावली आहे, असे समजले जाते. शरीराला पूरक आणि योग्य आहार घेत असणार्‍या तसेच नियमित स्वरुपात व्यायाम करणार्‍या व्यक्‍तींना वजन वाढीच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशा व्यक्‍तींनी डॉक्टरांचा सल्‍ला घेऊन योग्य ते उपचार करावेत. याचे कारण वजन वाढल्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होत असतात. या समस्या गंभीर व्याधींचे रूप धारण करण्याची शक्यता असते. नियमित व्यायाम करणार्‍या व डायटिंग करणार्‍या व्यक्‍तींचे वजन कमी न होण्याची अनेक कारणे असतात. यापैकी प्रमुख कारण म्हणजे, पचनशक्‍ती मंदावणे. शरीराला अन्‍नाद्वारे ऊर्जा पुरवली जाते. शरीरात ऊर्जा निर्मिण झाली नाही तर शरीराचे सगळे काम थंडावते. अन्‍नपदार्थांमधून ऊर्जा निर्माण करणे आणि ती शरीराला पुरवणे हे काम पचनक्रियेद्वारे केले जाते. आपण जेव्हा आराम करत असतो, तेव्हाही शरीराला ऊर्जेची गरज भासत असते. आपली पचनशक्‍ती चांगली असेल तर आपण वजनावर नियंत्रण ठेऊ शकतो. शरीराची पचनशक्‍ती मंदावली तर (बेसल मेटाबॉलिक रेट) शरीरात चरबी जमा होऊ लागते. एखादी मशिनरी बरेच दिवस वापरात नसेल तर तिला गंज चढतो. तसेच अशा मशिनरीवर काम केल्यास सुटे भाग काम करेनासे होतात. शरीराच्या आतील यंत्रणेचे काम असेच चालते. खूप वेळ उपाशी राहिल्यावर आपण जेव्हा काही खातो, तेव्हा अतिभुकेमुळे आपल्याकडून जास्त खाल्‍ले जाते. अशा वेळी आपण खाल्लेल्या सर्व पदार्थांचे ऊर्जेमध्ये रुपांतर होऊ शकत नाही. परिणामी त्या खाद्य पदार्थांचे चरबीमध्ये रुपांतर होऊ लागते. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार याचा फायदा आपली पचनशक्‍ती व्यवस्थित काम करत असेल तरच होऊ शकते. आहाराचे रूपांतर ऊर्जेत करणे आणि या ऊर्जेचा वापर करणे, हे चक्र व्यवस्थित चालू राहण्याला अत्यंत महत्त्व असते. हे चक्र बिघडले की, आपले आरोग्यही बिघडले हे लक्षात ठेवावे.

पचनशक्‍ती मंदावण्याची अनेक कारणे आहेत. वयोमानानुसार पचनशक्‍ती मंदावत जाते. 25 वर्षांनंतर प्रत्येक दहा वर्षांत पचनशक्‍तीत पाच ते दहा टक्के घट होते. जे लोक अजिबात व्यायाम करत नाहीत त्यांची पचनशक्‍ती लवकर मंदावते व ती लवकर पूर्ववत होत नाही. यामुळे नियमित व्यायाम अत्यंत गरजेचा आहे. विशेषतः चाळीशी ओलांडल्यानंतर न चुकता व्यायाम करणे आवश्यक आहे. जर पचनक्रिया व्यवस्थित काम करत असेल तर कोणाही व्यक्‍तीला आपले वजन नियंत्रणात ठेवता येऊ शकते. पचनक्रिया व्यवस्थित काम करण्यासाठी जॉगिंग, पोहोणे, टेनिस, बॅडमिंटन यांसारखे खेळ खेळणे आवश्यक असते. शरीराचा प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करण्यासाठी व्यायामाची अत्यंतिक गरज असते. याचबरोबर शरीरातील थायरॉईड ग्रंथींचे कार्य व्यवस्थित चालू राहणे आवश्यक असते. यात हार्मोन्सचे प्रमाण कमी जास्त झाले तर आपले वजनही कमी जास्त होत असते. म्हणून थायरॉईडची समस्या असणार्‍यांनी डॉक्टरी सल्ल्यानुसार नियमित औषधोपचार घ्यावेत. औषधांबरोबरच आहाराद्वारेही थायरॉईड हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राखता येते. प्रथिनांचे पचन करण्यासाठी शरीराला सर्वाधिक मेहनत करावी लागते. यामुळे आपली पचनशक्‍ती वाढवायची असेल तर अधिक प्रथिनेयुक्‍त आहार घेणे गरजेचे असते. दूध, अंडी, बिन्स, मासे, चिकन यांमध्ये प्रोटिन्सचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे असे पदार्थ आहारात नियमित रूपाने समाविष्ट करावेत. खूप वेळ उपाशी राहिल्यानंतर अन्‍नावर तुटून पडू नका. असे केल्यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर विपरीत परिणाम होत असतात. एकदम भरपूर जेवण्यापेक्षा दोन-तीन तासांच्या अंतराने थोडे थोडे खाणे फायदेशीर ठरते. भरपेट जेवण्याने पचनक्रियेवर ताण पडू शकतो. तसेच एवढ्या अन्‍नाचे ऊर्जेत रुपांतर करण्यासाठी वेळ लागतो. ठराविक अंतराने थोडा-थोडा आहार घेतल्यास ते अन्‍न पचणे सोपे जाते.

पचनक्रिया चांगली राहण्यासाठी व्यायाम व आहाराबरोबरच शरीराला पुरेशी विश्रांती देणेही अत्यंत आवश्यक असते. पुरेशी झोप न मिळाल्यास आपले वजन वाढण्याची शक्यता असते. आपल्या झोपेमध्येही शरीरातील ऊर्जेचा वापर होत असतो. रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे भूक लागल्यावर शरीराला अधिक उष्मांक असणारे खाद्य पदार्थ खावेसे वाटतात. अधिक उष्मांक असणार्‍या खाद्य पदार्थांमुळे आपल्या पचनक्रियेवर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे कमीत कमी सहा ते सात तास रात्रीची झोप घेणे अत्यंत आवश्यक असते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news