पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारोभाविक पंढरीत येतात. हे भाविक प्रथमत: चंद्रभागा स्नान महत्त्व देतात. त्यामूळे चंद्रभागेत पाणी स्वच्छ असणे भाविकांच्या द़ृष्टीने महत्त्वाचे आहे. मात्र, जल प्रदूषणास कारणीभूत ठरणारी वाहने चंद्रभागा पात्रात धुण्यास बंदी आहे. असे असतानाही बंदी झुगारून वाहने धुतली जात असल्याचे चित्र दिसून येते.यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सद्या उन्हाळी सुट्टी असल्याने शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे अनेकजण तीर्थाटण करण्यासाठी जात आहेत. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यसाठी देखील देशभरातून व राज्याच्या कानाकोपर्यातून दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येतात. मात्र, याभाविकांना नदीपात्रात स्नान करताना अस्वच्छ पाण्याचा सामना करावा लागतो. त्यामूळे बहुतांश भाविक स्नान न करता हात पाय धुण्यावर समाधान मानत आहेत. याच भरीस भर म्हणून अवजड वाहनांसह चार चाकी वाहनेदेखील नदीपात्रात धुतली जात आहेत. तसे पाहिले तर वाहने नदीपात्रात धुण्यास बंदी आहे. याबाबत घाटावर ठिकठिकाणी फलकही लावण्यात आलेले आहेत. मात्र, याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे.
नगरपालिकेने नदीपात्रात वाहने जाण्यापासून रोखण्यासाठी एक पथक तैनात करण्यात आलेले आहे. मात्र, हे पथक घाटावर फिरत असल्याने जुन्या दगडी पुलाजवळ वाहने नदीपात्रात उतरत आहेत. भरदिवसा वाहने धुतली जात आहेत. मात्र, याकडे पथक दुर्लक्ष करीत असल्याचेच चित्र दिसून येते.
चंद्रभागा नदीपात्रात वाहने उतरु नयेत, म्हणून घाटांवर व पात्रात जाणार्या रस्त्यांवर बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर एक पथक देखील तैनात करण्यात आलेले आहे. पथकाव्दारे वाहने धुणार्यावर लक्ष ठेवून कारवाई करण्यात येईल.
– सुनील वाळूजकर उपमुख्याधिकारी