पंढरपूर : आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढला

पंढरपूर : आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढला
Published on
Updated on

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारीसाठी येणार्‍या लाखो भाविकांना दर्शन मिळावे, यासाठी सोमवारपासून (दि. 12) परंपरेनुसार देवाचा पलंग कढण्यात आला. कोरोनामुळे मंदिर जरी बंद असले तरी विठुराया आता चोवीस तास ऑनलाईन दर्शनासाठी उभा असणार आहे.

आषाढीला येणार्‍या जास्तीत जास्त भाविकांना देवाचे दर्शन मिळावे, यासाठी विठ्ठल मंदिरात ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे मंदिर भाविकांना दर्शनाकरीता बंद आहे. असे असले तरी ही परंपरा सुरूच ठेवण्यात आली आहे.

सोमवारी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी श्री विठ्ठलाची पूजा करून विठ्ठलाच्या पाठीमागे मऊ कापसाचा लोड लावला आणि नंतर 'श्रीं'च्या शेजघरातील 'श्रीं'चा पलंग काढण्यात आला. याच पद्धतीने रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंगदेखील काढण्यात आला आहे.

रुक्मिणी मातेच्या पूजेनंतर रुक्मिणीमातेच्या मागे कापसाचा तक्क्या लावण्यात आला आहे. सोमवारपासून विठ्ठल-रुक्मिणी भाविकांसाठी चोवीस तास दर्शनाला उभे राहणार आहेत, त्यांना थकवा जाणवू नये, यासाठी पाठीच्या मागे कापसाचे लोड आणि तक्क्या
लावायची प्रथा चालत आली आहे, असे ते म्हणाले.

गहिनीनाथ महाराज म्हणाले, आषाढी व कार्तिकी यात्रेला श्रींना लोड व तक्क्या लावायची प्रथा आहे.सोमवारपासून देव झोपायलाच जाणार नसल्याने देवाचे सर्व राजोपचार बंद झाले आहेत.

आता देवाला सकाळी नैवेद्य, सायंकाळी लिंबूपाणी आणि सकाळी नित्यपूजा एवढेच उपचार केले जाणार आहेत. विठ्ठल मंदिर बंद असले तरी आता भाविकांना आजपासून रात्रंदिवस मंदिर समितीचे संकेतस्थळ, मोबाईल अ‍ॅपव्दारे विठुरायाच्या दर्शनाचा आनंद घेता येणार आहे.

श्री विठ्ठलास लोड व रुक्मिणी मातेस तक्क्या देतेवेळी गहीनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर,शकुंतला नडगिरे,कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.

वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा सोहळा अशी ओळख असलेल्या आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचे संकट आहे. यामुळे राज्य सरकारने 10 मानाच्या पालखी सोहळ्यांना पंढरपूरला येण्याची परवानगी दिली आहे. प्रातिनिधीक स्वरुपात 20 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे.

कोरोना संकटात सलग दुसर्‍या वर्षी होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. 17 जुलैपासून 25 जुलैपर्यंत पंढरपूर शहरासह शेजारच्या 9 गावात संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या कालावधीत सर्व खाजगी वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news