नरक- चतुर्दशी

नरक- चतुर्दशी

दीपावली उत्सवातील पुढचा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी सर्वसाधारपणे लोक या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करतात. याला मांगलिक स्नानही म्हटले जाते. अंगाला तेल, उटणे आणि अत्तर लावून ऊन पाण्याने स्नान केले जाते. अभ्यंग स्नानाच्या प्रथेत आरोग्याची वृद्धी हा महत्त्वाचा घटक आहे. आयुर्वेदाच्या द़ृष्टीने महत्त्वाच्या अशा अनेक वनस्पतींचा समावेश सुगंधी उटण्यात असतो. स्नान करतेवेळी आघाडा किंवा अपामार्ग वनस्पतीने अंगावर पाणी शिंपडावे म्हणजेच प्रोक्षण करावे, असा उल्लेख मिळतो. ही औषधी वनस्पती असून देवीला ती आवडते, असे मानले जाते. एकंदर देवतांच्या पत्रपूजेत आघाड्याचा समावेश असतो. स्नानानंतर यमदेवतेला नमस्कार करून जलांजली वाहायची असते. संध्याकाळी पुन्हा दीपदान केले जाते आणि काही ठिकाणी पितृतर्पण देखील केले जाते. नरकचतुर्दशी साजरी करण्यामध्ये प्रादेशिक विविधता खूप आढळते. सकाळी स्नानानंतर चिरांटं किंवा कारीट नावाचं एक कडू फळ नरकासुराचे प्रतीक म्हणून चिरडले जाते. परंतु यातही भौगोलिक भिन्नतेनुसार जी वनस्पती उपलब्ध असते, तिचा वापर केलेला दिसतो.

नरकचतुर्दशीबाबत लोकप्रिय पौराणिक कथा आहे, ती नरकासुर वधाची. नरकासुर हा प्राग्ज्योतिषपुराचा राजा होता. त्याला पृथ्वीदेवतेकडून वैष्णवास्त्र मिळाले. त्यामुळे तो उन्मत्त झाला. माणसं, देवादिक अशा सार्‍यांना पीडा देऊ लागला. राजांना, त्यांच्या मुलींना कारागृहात डांबून ठेवू लागला. अशावेळी इंद्राने श्रीकृष्णांची प्रार्थना केली. मग श्रीकृष्णाने नरकासुरावर आक्रमण करून त्याचा वध केला. मरतेवेळी नरकासुराने आपल्या नावाची आठवण पृथ्वीवर राहावी, म्हणून श्रीकृष्णाकडे वर मागितला की, "आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल, त्याला नरकाची पीडा होऊ नये." त्यामुळे तो दिवस नरकचतुर्दशी म्हणून रूढ झाला. मराठी कीर्तनपरंपरेत हे प्रसिद्ध आख्यान आजही सादर केले जाते.

भारताच्या अन्य भागांत नरकचतुर्दशीच्या दिवसाला काली चौदस, रूप चौदस, छोटी दिवाली, नरक निवारण चतुर्दशी किंवा भूत चतुर्दशी या नावांनी संबोधिले जाते. तेल, फुले, आणि चंदन यांचा वापर करून देवपूजा केली जाते. हनुमानाला नारळ अर्पण केला जातो. आणि तीळ, गूळ आणि पोहे यांचा प्रसाद दिला जातो. पिकांच्या संपन्नतेचा काळ या मुख्य रूपातच दिवाळी हा सण साजरा होत असल्याचे दिसते. पश्चिम भारतात ताज्या पोह्यांचे पदार्थ विशेषतः बनवले जातात. तंत्र शास्त्राची उपासना करणारे साधक या दिवशी त्यांचा मंत्र शिकतात किंवा ग्रहण करतात.

आपल्यापासून संकटे दूर राहावीत म्हणून कुलदेवीला स्थानिक परंपरेनुसार नैवेद्य दाखविला जातो. या दिवशीच्या सकाळी सगेसोयर्‍यांसह दिवाळीच्या खास पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. पश्चिम बंगालमध्ये कालीपूजेच्या आधीचा हा दिवस भूतचतुर्दशी म्हणून साजरा केला जातो. बंगाली सांस्कृतिक परंपरेत काली देवतेस महत्त्वाचे स्थान आहे. मृत आणि जिवंत जीवमात्रांच्या जगांमधील आवरण खूप झिरझिरीत असते आणि या दिवशीच्या संध्याकाळी पितरं आपल्या प्रिय जनांना भेटण्यासाठी येतात, असे चिंतन या निमित्ताने मांडले गेलेले आढळते. आपल्या मागच्या चौदा पिढ्यांमधील पूर्वज यावेळी येतात. त्यांच्यासाठी चौदा दिवे घराभोवती मांडले जातात. घराच्या आतील-बाहेरील प्रत्येक अंधारा कोपरा उजळला जातो. विशेष चौदा दिव्यांमुळे आपल्या पितरांना घराकडे यायचा मार्ग कळतो, अशी श्रद्धा आहे.

'काली' या प्रतीकात अनंततत्त्वाचा अर्थ दडला आहे. पार्वतीच्या सौम्य रूपाचा दुसरा आविष्कार म्हणजे काली 'काल' म्हणजे 'समय' त्याचं स्त्री रूप आहे काली. दिवाळीच्या आनंदोत्सवाच्या वेळी विविध प्रसंगी पित्तरांचं जे स्मरण करतात, त्याचे कारण जाणणं महत्त्वाचं आहे. निसर्गातही काली व्यापून असते. जी पानगळ सुरू होते, अस्तित्व संपणं असतं, त्यात अबोल खिन्नता असते. त्यात अपरिहार्यतेला शरण जाण्याचा भाव असतो.

पण सृजनाची, नव्या अंकुरांची एक दूरवरची आशाही तिथंच दडलेली असते. कालीची संहारक शक्ती स्नेहानं परिपूर्ण असते 'काली' एक अनुभव म्हणून समोर उभा ठाकते, तेव्हा माणसाचा बौद्धिक यशाचा अहंकार गळून पडतो. आपल्याला प्रत्येकाला आयुष्यात कुठेतरी पोहोचायची ऊर्मी असते. पण म्हणजे जायचं तरी कुठे असतं? कर्मफळांचा होम प्रत्येकाला पूर्ण करावाच लागतो. आयुष्यातला प्रत्येक क्षणही तर संपतो, मागे पडतो. ही आहे काली !

दीपावलीच्या उत्सवात माणसाच्या आनंदाचे प्रकटीकरण आहे. पण त्याच वेळी गतकाळाचे भान आहे. जिवंत आणि गत जग आणि निसर्गातून मिळालेली धान्यलक्ष्मी यांचे खूप सुंदर संतुलन दिवाळीच्या प्रत्येक दिवसाच्या प्रथेतून साधलेले दिसते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news