कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या स्थापत्यकलेचे वैशिष्ट्य असणार्या किरणोत्सवाची पर्यटक-भाविकांनी प्रतिवर्षीप्रमाणेच उत्सुकता आहे. किरणोत्सवाच्या तिसर्या दिवशी (सोमवार) पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाला. सायंकाळी 6 वाजून 18 मिनिटांनी मावळतीची सूर्य किरणे मूर्तीच्या किरिटापर्यंत पोहोचली.
किरणोत्सव याच्या पहिल्या दिवशी किरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली होती. दुसर्या दिवशी (रविवार) स्वच्छ हवामान व प्रखर किरणांमुळे सूर्यकिरणे देवीच्या मुखकमलापर्यंत पोहोचली. महाद्वार, गरुड मंडप, कासव चौक, पितळी उंबरा, गाभारा असा प्रवास करत सोनेरी किरणांनी देवीच्या मूर्तीवर पूर्णक्षमतेने प्रकाशझोत टाकला.
6 वाजून 15 मिनिटांनी किरणे गर्भकोटी तर 6 वाजून 18 मिनिटांनी किरणे मूर्तीच्या किरिटापर्यंत पोहोचली. ज्यावेळी मूर्तीवर किरणे पडली त्यावेळी किरणांची क्षमता अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजेच 73 लक्ष मीटर इतकी होती, अशी माहिती खगोल अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर यांनी दिली.
दरम्यान, किरणोत्सवाचा आनंद भाविकांना घरबसल्या घेता यावा यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने सोशल मीडियावरून ऑनलाईन किरणोत्सवाची व्यवस्था करण्यात आली होती.