एक गांडूळ दररोज त्याच्या वजनाइतकी विष्ठा बाहेर टाकते. याशिवाय, त्याच्या विष्ठेतून नत्र, स्फुरद, पालाश, चुनखडी, मॅग्नेशियम ही मूलद्रव्ये पिकांना मिळतात. गांडुळामुळे जमिनीची सुपिकता वाढते. कारण, त्याच्या अस्तित्वामुळे जमिनीतील खनिज, नत्राचे प्रमाण वाढते.
सध्या शेतीमध्ये रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने त्याचा पिकांवर आणि जमिनीवर दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येते. याउलट सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीची सुपिकता वाढते. चार हजार वर्षांपासून आपले पूर्वज शेती करत होते. पूर्वी शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जमिनीची सुपिकता टिकून राहत असे. सध्या मात्र परिस्थिती बदलली आहे. अशा परिस्थितीत गांडुळांमुळे उसाचे उत्पादन वाढते आणि साखरेचा उताराही वाढतो, असे दिसून आले आहे.
1960 मध्ये पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रात संशोधन करण्यात आले होते. या संशोधनानंतर मुंबई, पुणे येथील खासगी सहकारी संस्थांनी गांडूळ आणि गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू केले. गांडूळ खतामुळे पिकांची उत्पादन क्षमता वाढते, असे दिसून आले आहे. गांडुळे हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहेत.
त्यांचा रंग आणि आकार भिन्न भिन्न असल्याचे दिसून येते. जांभळी, लाल, तांबडी, निळी, हिरवी, तपकिरी, फिकट तांबूस अशा विविध रंगांची गांडुळे आढळतात. सर्वात लहान आकाराची गांडुळे एक इंचापेक्षाही कमी लांबीची, तर सर्वात मोठे गांडूळ दहा फूट लांबीचे ऑस्ट्रेलियामध्ये आढळले होते.
अलीकडच्या काळात, दक्षिण आफ्रिकेमध्ये अजगरासारखी अजस्र आकाराची गांडुळेही आढळली आहेत. त्यांची लांबी 20 फूट आणि मध्यभागाची जाडी तीन फुटांपर्यंत असते. अर्थात, आपल्याला अशा गांडुळांचा विचार करायचा नाही. सर्वसाधारण नेहमी आढळून येणारे गांडेळ हे सहा ते आठ इंच लांबीचे असते.
मोठ्या प्रकारची गांडुळे जमिनीत तीन मीटर खोलीपर्यंत जातात आणि मातीचा खाद्य म्हणून वापर करतात. त्यामुळे सर्वसाधारण आकाराची गांडुळेच शेतीसाठी वापरणे योग्य ठरते. गांडूळ हा उभयलिंगी आणि निरुपद्रवी प्राणी असून तो बिळ करून राहतो. बिळामध्ये राहून ते तोंडावाटे माती आणि सोबत येणारे सेंद्रिय पदार्थ गिळून विष्टा बाहेर टाकतात. सेंद्रिय पदार्थ हे गांडुळाचे मुख्य अन्न असते. गांडुळाच्या काही प्रजाती जमिनीवर पडलेली झाडाची पानेदेखील आपल्या बिळात ओढून नेतात.
काही गांडुळे माती खातात. त्यावेळी त्यांना त्या मातीतील सेंद्रिय पदार्थ मिळतात. एक गांडुळ एका वर्षात 400 ग्रॅम सेंद्रिय पदार्थ खात असते. एक चौरस मीटरमध्ये गांडुळांची संख्या 200 असल्यास ते प्रतिवर्षी हेक्टरी 80 टन सेंद्रिय पदार्थ खातात; पण शेतातील गांडुळे प्रत्यक्षात इतक्या मोठ्या प्रमाणात सेंषद्रय पदार्थ खात नाहीत. गांडुळाच्या शरीरातून चयापचयानंतर उत्सर्जित झालेल्या मृद गंधयुक्त काळसर रंगाच्या वजनाला हलक्या आणि कणीदार दिसणार्या विष्ठेला वर्शीकंपाष्ट असे म्हटले जाते.
एक गांडूळ दररोज त्याच्या वजनाइतकी विष्ठा बाहेर टाकते. याशिवाय त्याच्या विष्ठेतून नत्र, स्फुरद, पालाश, चुनखडी, मॅग्नेशियम ही मूलद्रव्ये पिकांना मिळतात. गांडुळामुळे जमिनीची सुपिकता वाढते. कारण, त्याच्या अस्तित्वामुळे जमिनीतील खनिज, नत्राचे प्रमाण वाढते.
मेलेल्या गांडुळाचे शरीर जमिनीत बुजल्यानंतरही पिकांना नत्र मिळते. एका मेलेल्या गांडुळापासून 10 मिलिग्रॅम इतके नायट्रेट मिळते. जमिनीच्या खोल थरामध्ये असणारी गांडुळे खालच्या थरातील माती पृष्ठभागावर आणून टाकतात. यामुळे मातीची उलथापालथ होते. या हिशेबाने गांडुळे हेक्टरी दोन ते अडीच टन मातीची उलथापालथ करतात.
गांडुळाच्या विष्ठेतील मातीची संरचना कणीदार असते. त्यामुळे ही विष्ठा पाण्याने वाहून जात नाही. यामुळे जमीन भुसभुशीत राहण्यास मदत होऊन पावसाचे पाणी जमिनीत मुरते. जमिनीतील पाण्याचा योग्य प्रकारे निचरा झाल्याने जमिनीत हवा खेळती राहते. गांडुळामुळे जमिनीची धारणक्षमता 20 टक्क्यांनी वाढते, असे दिसून आले आहे. या सर्व द़ृष्टीने गांडूळ खत हा शेतीच्या वृद्धीसाठी उत्तम पर्याय आहे. – जगदीश काळे