कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : 'भारत जोडो' यात्रेत राहुल गांधी यांनी शनिवारी कोल्हापूरच्या ऋषीकेश घोरपडे या तरुणाचे कौतुक केले ऋषीकेशने अशोकन ब्राह्मी लिपीमध्ये 'भारत जोडो यात्रा एडिक्ट' ही कॅलिग्राफी करून राहुल गांधी यांना हिंगोली येथे भेट दिली. हे पेंटिंग्ज त्यांनी स्वीकारून या तरुणाचे मी जाहीर कौतुक करून आभार मानतो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या वैयक्तिक फेसबुक पेजवरही पोस्ट टाकत त्याने दिलेल्या भेटीबाबत आनंद व्यक्त केला.
'भारत जोडो' यात्रा शनिवारी हिंगोलीत आली. यावेळी ऋषीकेश याने गर्दीतून हात उंचावून स्वत: केलेले कॅलिग्राफी पेंटिंग्ज दाखवले. पहिल्या दोन वेळा राहुल यांचे त्याकडे लक्ष गेले नाही. तिसर्या वेळी मात्र राहुल गांधी यांचे ऋषीकेश यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनी सुरक्षारक्षकांना ऋषीकेशला आपल्यापर्यंत सोडायला सांगितले. त्याच्या हातातील ते पेंटिंग्ज काय आहे हे राहुल यांनी जाणून घेतले.
ज्याप्रमाणे सम्राट अशोक याने त्याच्या शिलालेखात शांती, अहिंसा, बंधुभाव यांचा संदेश दिला, त्याचप्रमाणे राहुलदेखील शांती, अहिंसा, बंधुभाव यांचा संदेश भारत जोडो यात्रेत देत आहेत. त्यामुळे 'अशोकाचे शिलालेख' ज्या ब्राह्मी लिपीत आहेत, त्याच ब्राह्मी लिपीत 'भारत जोडो यात्रा एडिक्ट' या कॅलिग्राफी पेंटिंग्जमध्ये या यात्रेचा हेतू, राहुल यांचा अहिंसा आणि बंधुभाव हा संदेश आदी माहिती, यात्रेचा मार्ग आणि अशोक चक्र काढलेले असल्याचे सांगितले.
राहुल यांना ही संकल्पना आणि पेंटिंग्ज खूप आवडले. त्यांनी ते स्वीकारले. या पेंटिंग्जबरोबर ऋषीकेश यांनी काही आत्ता वापरत असलेल्या आणि काही ऐतिहासिक अशा वेगवेगळ्या 56 लिपींमध्ये 'भारत', 'राहुल', 'सोनिया', 'राजीव', 'गांधी' ही नावे देखील लिहून भेट दिली. यानंतर राहुल गांधी यांनी ऋषीकेशच्या पेंटिंग्जचे कौतुक केले. सम्राट अशोक याचा अहिंसा, प्रेम, परस्पर स्नेह, शांती हा संदेश प्राप्त परिस्थितीमध्ये देशाला गरजेचा आहे आणि हाच विचार घेऊन भारत जोडो यात्रा सुरू आहे. कोल्हापूर येथील या तरुणाचे मी जाहीर कौतुक करून आभार मानतो, अशी पोस्ट प्रत्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या वैयक्तिक फेसबुक पेजवरही टाकली.