कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण विश्व अभियांत्रिकीने व्यापून गेले आहे. सायन्स, डिप्लोमा, अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये करिअरच्या सर्वसमावेशक संधी उपलब्ध आहे. क्षेत्र कोणतेही असो मनापासून करिअर केल्यास अभियांत्रिकी क्षेत्रात स्कोप आहे, असा सूर शनिवारी तज्ज्ञांनी व्यक्त केला. औचित्य होते, दै. 'पुढारी' व पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित दहावी-बारावीनंतरच्या करिअर मार्गदर्शन सेमिनारचे. येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे हा सेमिनार झाला.
महाराष्ट्र असो. ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्सचे अध्यक्ष डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी 'अभियांत्रिकी कॉलेजची निवड व प्लेसमेंटच्या संधी' तर प्रसिद्ध करिअर सल्लागार, लेखक व प्रेरणादायी व्याख्याते प्रा. विजय नवले यांनी 'बारावीनंतरची करिअर निवड' विषयावर विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी दै. 'पुढारी' चे जनरल मॅनेजर (ऑपरेशन्स) राजेंद्र मांडवकर, प्रा. किरण जाधव, प्रा. योगेश खैरनार उपस्थित होते.
डॉ. रवंदळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी विविध शाखांसह शैक्षणिक संस्थांची माहिती घेऊन प्रवेश प्रक्रियेला समोरे जावे. कॅम्पस प्लेसमेंट हा महाविद्यालयाची निवड प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेत जावा, पण तेथील उच्चस्थान प्राप्त करण्यासाठी परिश्रम घ्या. बदलत्या तंत्रज्ञानामुळे आगामी काळात अभियंत्यांना जागतिक स्तरावर संधी आहेत. अभियांत्रिकीसह बी. व्होकेशनललादेखील मोठ्या संधी आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय करायचे ठरविले जाते. असे न करता विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या दुसर्या वर्षात असतानाच आपल्याला पुढे काय करायचे आहे, हे निश्चित ठरविले पाहिजे. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व्यवसायाभिमुख शिक्षणात अग्रेसर असल्याचे डॉ. रवंदळे यांनी नमूद केले.
प्रा. विजय नवले म्हणाले की, मला एखाद्या क्षेत्रातून काय मिळणार आहे, यापेक्षा मी त्या क्षेत्राला काय देणार, याचा विचार करिअर निवडीत झाला पाहिजे. शाखा निवडताना पैसा केंद्रस्थानी नव्हे तर कर्तृत्व केंद्रस्थानी ठेवा. शाखा आणि कॉलेजची निवड अतिशय महत्त्वाची आहे. आवडीच्या क्षेत्रात काम करावे अथवा जे क्षेत्र मिळाले आहे त्यात आवड निर्माण करावी. उद्योजकता आणि संशोधन ही आगामी काळातील महत्त्वाची कार्यक्षेत्रे असतील, असे त्यांनी नमूद केले.
चर्चासत्रानंतर विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांचे निरसन डॉ. रवंदळे, प्रा. नवले यांनी केले. या चर्चासत्रास विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दीपा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.