कोल्हापूर : पंचगंगेचे अखंड प्रदूषण

कोल्हापूर : पंचगंगेचे अखंड प्रदूषण
Published on
Updated on

कोल्हापूर, डॅनियल काळे : पंचगंगा खोर्‍यातील 177 गावांपैकी 88 गावांचे सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट पंचगंगेत मिसळत आहे. यापूर्वी 39 गावांचे पाणी थेट मिसळत होते. यामध्ये 49 गावांची वाढ झाल्याने नदी प्रदूषणाचा विळखा आणखीन घट्ट झाल्याचे या अहवालावरून स्पष्ट होत आहे.

पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न 1988 पासून प्रशासनाची डोकेदुखी बनत चालला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणात कोल्हापूर शहरातील सांडपाण्याचा वाटा पन्नास टक्के इतका होता. कोल्हापूर महापालिकेने 2009 पासून काही उपाययोजना करून यापैकी 90 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. त्यासाठी कसबा बावडा व दुधाळी नाल्यावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे करण्यात आले आहेत. तरीदेखील पंचगंगा प्रदूषण थांबत नसल्याने नदीकाठावरील गावांतूनही मोठ्या प्रमाणात सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा परिषदेने पाहणी करून प्रदूषण नियंत्रण महामंडाळाला अहवाल सादर करावा, अशी सूचना न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान केली होती.

जिल्हा परिषदेने पाहणी करण्याची जबाबदारी केआयटी कॉलेजवर सोपविली होती. त्यानुसार केआयटी कॉलेजने पाहणी करून जिल्हा परिषदेला अहवाल सादर केला आहे. या अहवालात काही निष्कर्ष धक्कादायक आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, यापूर्वी नदीकाठावरील केवळ 39 गावांचेच सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळत होते. आता यामध्ये 49 नव्या गावांची वाढ झाली आहे. त्यामुळे ही संख्या 88 इतकी झाली आहे. त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषणाचा विळखा आणखीन घट्ट झाला आहे. या 88 गावांतून सुमारे 60 एमएलडी पाणी थेट नदीत मिसळत आहे.

सांडपाणी व्यवस्थापनासाठी 200 कोटींची आवश्यकता

केआयटी महाविद्यालयाने हा अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला आहे. जिल्हा परिषदेकडून यासंदर्भातील एक पत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला मंगळवारी (दि. 13) पाठविले जाणार आहे. 'या' 88 गावांतून सुमारे 60 एमएलडी सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 200 कोटींची मागणी जिल्हा परिषद करणार आहे.

'जलजीवन मिशन'मुळे पाणी वापर वाढला

राज्य शासनाच्या 'जलजीवन मिशन'मुळे अनेक गावांना पाण्याच्या योजना झाल्या आहेत. तसेच या गावांना यापूर्वी प्रतिमाणसी प्रतिदिवशी 25 लिटर इतका पाणीपुरवठा होत होता. यामध्ये आता वाढ झाली असून, प्रतिमाणसी प्रतिदिन 55 लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळेदेखील सांडपाणी वाढत चालले असून, कोणत्याही प्रक्रियेविना हे पाणी नदीत मिसळत आहे. सांडपाणी नदीत सोडणार्‍या गावांचीही संख्या वाढली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news