कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर येथील कणेरीवाडी येथे धूमधडाक्यात लग्न झाले व हॉल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाने घालून दिलेले नियम व अटी धाब्यावर बसवून कणेरीवाडी येथे एका मंगल कार्यालयात धूमधडाक्यात सुरू असलेल्या लग्न सोहळ्यावर गोकुळ शिरगाव पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. त्यामुळे मंगल कार्यालयाच्या मालकासह आयोजकांचे धाबे दणाणले. याप्रकरणी मंगल कार्यालयाच्या मालकावर गुन्हा दाखल झाला आहे .
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गापासून अगदी हाकेच्या अंतरावर एक मंगल कार्यालय आहे.
पंचगंगा पुलापलीकडील गावातील मुलगी तर करवीरच्या पूर्व गडाच्या गावाचा मुलगा यांच्या लग्नासाठी या मंगल कार्यालयात दोन्हीकडील वर्हाडी मंडळी जमली होती.
त्यातच पाहुणा पोलिस अधिकारी असल्याने लग्न धूमधडाक्यात करण्याच्या निर्णयाला चांगलेच बळ मिळाले.
या मंगल कार्यालयात दोन्हीकडील वर्हाडी मंडळींनी गुरुवारी तोबा गर्दी केली होती. रस्त्यावरही वाहनांची मोठी रांग लागली होती. हे पाहून जिल्ह्यातून कोरोना हद्दपार झाला की काय? असा प्रत्यक्षदर्शीचा भास झाल्यावाचून राहिला नाही.
मात्र, गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने या मंगल कार्यालयात छापा टाकला.
लग्न मंडपातील गर्दी पाहून काही काळ पोलिसही चक्रावले. हॉल व गाड्यांचे व्हिडीओ शूटिंग करण्यात आले.
जिल्हाधिकारी यांचा आदेश झुगारून मंगल कार्यालयात लग्नासाठी गर्दी जमवल्याचा गुन्हा मंगल कार्यालयाचा मालक किरण मनोहर मगदूम (वय 38) याच्यावर करण्यात आला.
कोरोना रोखण्यासाठी गावागावांत दक्षता समिती स्थापन केली आहे. यामध्ये सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेवक अशी मंडळी कार्यरत आहेत.
मात्र, यातील कोणीही मंडळी कारवाईसाठी येथे आली नाहीत. त्यामुळे दक्षता समिती गायब असल्याचे पाहायला मिळाले.