वाई ; पुढारी वृत्तसेवा : किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत गुरुवारपर्यंत 115 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार (दि. 1 एप्रिल) हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज विक्रमी संख्येने अर्ज दाखल होतील, अशी शक्यता आहे.
किसनवीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चांगलीच रंगात येणार आहे. मदनदादा भोसले व मकरंदआबा यांनी या निवडणुकीच्या फडात उडी घेतल्यानंतर सभासदांचा उत्साह दुणावला आहे. संचालकांच्या 21 जागांसाठी येत्या 3 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी 28 मार्चपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारपर्यंत 115 अर्ज दाखल झाले. ऊस उत्पादक मतदारसंघ कवठे-खंडाळा-भुईंज, वाई-बावधन-जावली, सातारा- कोरेगाव या ऊस उत्पादक गटातून व अनुसूचित जाती -जमाती राखीव, महिला राखीव गटातून हे अर्ज दाखल झाले आहेत.
गटनिहाय भरलेले उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे – कवठे खंडाळा (10), भुईंज (24), बावधन (11), सातारा (22), कोरेगाव (30) अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती राखीव (7), महिला राखीव (5), इतर मागास प्रवर्ग (4) आणि विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गमधून (2) असे 115 अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मनोहर माळी यांनी दिली.
सर्वाधिक अर्ज कोरेगाव, भुईंज, आणि सातारा ऊस उत्पादक गटातून दाखल झाले आहेत. कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले व आ. मकरंद पाटील यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल होण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, उमेदवारी दाखल करण्यासाठी शुक्रवार (दि. 1) अखेरचा दिवस असल्याने सत्तारूढ व विरोधी पॅनेलमधील इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू आहे.