किरीट सोमय्या म्हणाले, हिंमत असेल तर कोल्हापूर दौरा रोखून दाखवा!

किरीट सोमय्या म्हणाले, हिंमत असेल तर कोल्हापूर दौरा रोखून दाखवा!
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : प्रवेशबंदीमुळे कराडमधून परत आलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा कोल्हापूर दौरा आखला आहे. हसन मुश्रीफ यांच्या कथित घोटाळ्याची तक्रार करण्यासाठी ते मंगळवारी कोल्हापूरला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर 'हिंमत असेल तर सरकारने अडवून दाखवावे', असे आव्हान सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारला दिले आहे. त्यामुळे आता सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे कथित घोटाळे उघडकीस आणणार असल्याची घोषणा करून सोमय्यांनी नुकताच दौर्‍याचा निर्धार केला होता. परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा जोरदार विरोध पाहून कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांनी सोमय्या यांना प्रवेशबंदी केली होती. पोलिसांनी त्यांना मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवरच अडवले होते.

आपल्याला कोल्हापूरमध्ये प्रवेशबंदी असून मुंबईतून प्रवासाला बंदी नाही, असा युक्तिवाद करून ते रवाना झाले; मात्र कराडला पोहोचताच पोलिसांनी त्यांना कोल्हापुरात न जाण्याची विनंती केली. त्यानंतर सोमय्या मुंबईला परतले होते. आता त्यांनी आपण मंगळवारी कोल्हापूरला जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्यासोबत विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी आणि आशिष शेलारही जाणार आहेत.

मुश्रीफ यांनी गडहिंग्लज साखर कारखान्यात 127 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप आहे. त्याबाबत तेथे जाऊन पाहणी करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news