मुंबई/पुणे ; पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरात रविवारी दुपारच्या सुमारास कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याचे सोमवारी सकाळी चक्रीवादळात रूपांतर होईल. मात्र, ते लगेच 24 तासांत शमणार आहे. यामुळे किनारपट्टीवरील भागात धुळीचे लोट अन् सोसाट्याचा वारा वाहणार असल्याने नागरिकांसह मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या वातावरणामुळे महामुंबईचे तापमान रविवारी काहीसे घसरलेले होते.
रविवारी दुपारी 4 च्या सुमारास बंगालच्या उपसागरात अंदमान- निकोबार बेटांजवळ कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती झाली. सोमवारी त्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात व पुढे चक्रीवादळात रूपांतर होणार असून वार्याचा वेग रविवारी 20 रोजी ताशी 55 ते 60 किमी होता; तर सोमवारी 21 रोजी हा वेग वाढून ताशी 80 ते 85 किमीवर जाणार आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील भागांत सोसाट्याच्या वार्यासह धुळीचे लोट तयार होतील, दृष्यमानता कमी होईल तसेच समुद्र खवळलेला राहणार असल्याने नागरिकांसह मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
सोमवारी, 21 मार्च रोजी हे चक्रीवादळ पुन्हा कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतरित होऊन ते सायंकाळपर्यंत शमणार आहे, मात्र 22 मार्चपर्यंत समुद्र खवळलेला राहील व वार्याचा वेगही ताशी 50 ते 55 कि.मी. इतका राहणार आहे.
उष्णतेची लाट कायम राहणार
महाराष्ट्रात काही भागात ढगाळ वातावरण राहून सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात या वार्यामुळे झाडपडी, वीज तारांचे नुकसान होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान राज्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
मुंबई, ठाण्याचा पारा घसरला
मुंबईसह ठाण्यात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मुंबईचा पारा तब्बल 33. 2 अंशांपर्यंत घसरला, तर ठाण्यातही 31 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पहाटेच्या वेळेस हवेत हलकासा गारवा जाणवत होता. त्यानंतर दिवसभर मात्र घामटा निघाला. आर्द्रतेचे प्रमाण 80 टक्क्यांहून अधिक होते. विदर्भात मात्र अनेक भागांत तापमान अजूनही चाळीशीपार आहे. रविवारी अकोला येथे सर्वाधिक 42.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली.
अरबी समुद्रातून वाहणारे बाष्पयुक्त वारे आणि दक्षिणेकडून येणारे वारे यांमुळे मुंबईसह ठाणे आणि काही भागांत दिवसभर ढगाळ वातावरण होते, तर राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडून येणार्या उष्ण वार्यांमुळे विदर्भाचा पारा चढाच असल्याची माहिती स्कायमेटच्या महेश पलावत यांनी दिली.