मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही सत्तारूढ महाविकास आघाडीला धक्का बसल्यानंतर मंगळवारी दुसर्याच दिवशी महाराष्ट्र राजकीय भूकंपाने हादरला. शिवसेनेचे गटनेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीच बंडाचा झेंडा हाती घेत समर्थक आमदारांसह थेट सुरत गाठले. शिंदे यांच्यासमवेत किमान ४० आमदार असावेत, असा अंदाज आहे. मात्र या बंडाळीने शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीतील सरकार अल्पमतात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे दोन तृतीयांश म्हणजे ३७ आमदार गेल्यास ठाकरे सरकार कधीही कोसळू शकते, अशी स्थिती आहे. यासाठीची जुळवाजुळव कशी होते हे लवकरच स्पष्ट होईल. सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेकडून युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या आणि सुरत मुक्कामी ठाकरे यांचे दोन दूत पोहोचलेदेखील. मात्र, 'काँग्रेस – राष्ट्रवादीला सोडा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत सरकार बनवा', अशी भूमिका शिंदे यांनी घेतली आहे. तसे कोणतेही आश्वासन न देता उद्धव यांनी शिंदे यांना 'मुंबईत या, मला भेटा, सर्व काही व्यवस्थित होईल' इतकेच सांगितले.