बीड, पुढारी वृत्तसेवा : गतवर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर्षी तीच परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य शासन खबरदारी घेत आहे. येत्या आठ दिवसांत म्हणजेच 15 ऑक्टोबरपर्यंत साखर कारखान्यांचे गाळप सुरू केले जाईल, अशी माहिती सहकारमंत्री अतुल सावे यांनी येथे दिली.
राज्यातील ऊस गाळपाबाबत त्यांना विचारले असता, यावर्षी 1 ऑक्टोबरपासूनच गाळप हंगाम सुरू करावा, अशा सूचना कारखान्यांना केल्या होत्या. परंतु काही भागात पाऊस सुरूच असल्याने शेतात पाणी आहे. अशा स्थितीत ऊस तोडणी व वाहतूक करणे शक्य नव्हते. यामुळे कारखान्यांनी मुदत वाढवून मागितली होती.
आता येत्या आठ दिवसांत म्हणजेच 15 ऑक्टोबरपासून राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊ शकेल, असे ते म्हणाले. गतवर्षीप्रमाणे अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. तशीच परिस्थिती पुन्हा उद्भवू नये याकरिता आतापासूनच नियोजन केले जाणार असून कारखान्यांना याबाबत सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बीडसह नाशिक, सोलापूर, पुणे यासह पाच ते सहा जिल्हा बँकांवर प्रशासक आहे. यावर येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सावे यांनी यावेळी दिली.