‘आंबा घाट’ कोकणचे की, मृत्यूचे प्रवेशद्वार?

कोल्हापूर : आंबा घाटातील या ‘विसावा पॉईंट’वर संरक्षक कठडाच नसल्याने कोल्हापूरची एक कार दरीत कोसळल्याने वाहनचालकाला जीव गमवावा लागला. एकाचा जीव गेल्यानंतरही अद्यापही या ठिकाणी कठडा उभारण्यात आलेला नाही.
कोल्हापूर : आंबा घाटातील या ‘विसावा पॉईंट’वर संरक्षक कठडाच नसल्याने कोल्हापूरची एक कार दरीत कोसळल्याने वाहनचालकाला जीव गमवावा लागला. एकाचा जीव गेल्यानंतरही अद्यापही या ठिकाणी कठडा उभारण्यात आलेला नाही.

कोल्हापूर; सुनील सकटे : आंबा घाटाला कोकणचे प्रवेशद्वार मानले जाते. कोल्हापुरातून कोकणात जायचे, तर आंबा घाट हा एक पर्याय आहे. अपघाताची शक्यता बळावलेल्या ठिकाणांवर संरक्षक कठड्यांचा अभाव असल्याने आंबा घाट हा कोकणचे नव्हे, तर 'मृत्यूचे प्रवेशद्वार' बनला आहे. आंबा घाटातून जायचे म्हणजे 'स्मशान घाटा'कडे जायचे, असे भय येथून वाहने नेणार्‍यांना आता वाटू लागले आहे. घाटात धोकादायक वळणेे इतकी आहेत की, कुठले वळण अंतिम ठरेल, हे सांगता येत नाही.

सरकारी बाबूंची अनास्थाही या धोकादायक वळणांसारखीच आहे. घाटात अलीकडेच कोल्हापूरच्या एका ज्येष्ठ नागरिकाला आपला जीव गमवावा लागला. आता यंत्रणा गेंड्याच्या कातडीची आहे की, यंत्रणेने गेंड्याची कातडी पांघरली आहे, हे कळायला मार्ग नाही; पण या क्षणापर्यंत अपघात झालेल्या ठिकाणावर संरक्षक कठडा बांधण्याची कोणतीही तसदी यंत्रणेने घेतलेली नाही.

जेथे अपघात घडला आहे, अशा ठिकाणाचीही दखल 'एनएचआय'च्या अधिकार्‍यांना घ्यावीशी वाटत नसेल; तर अपघात घडू शकतात, अशी ठिकाणे हेरण्यात हे अधिकारी कितपत तत्पर असतील? याची कल्पनाच केलेली बरी! आंबा घाटात जेथे हवाच होता, अशा एका ठिकाणावरही संरक्षक कठडा नसल्याने एक मोटार शेकडो फूट खोल दरीत कोसळली आणि वाहनधारकाला जीव गमवावा लागला.

या ठिकाणावर जेथे मजबूत कठडे हवे होते, तेथे एक पाईप आडवा लावून ठेवला आहे. हा पाईप कोसळण्याच्या मार्गावर असलेल्या सायकलीलाही आधार देऊ शकत नाही असा आहे, तेथे मोटारीची काय गत? मोटार दरीत कोसळली त्या ठिकाणाचे नाव 'विसावा पॉईंट' आहे, हा आणखी एक क्रूर विनोद! 'विसावा पाईंट'पासून काही अंतरावर एका धोकादायक वळणावर कठडा आहे; पण अर्धा कोसळलेला, स्वत:च निराधार..!

कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातून कोकणात जायचे तर आंबा घाट रस्ता महत्त्वाचा आहे. रत्नागिरी-नागपूर हा महामार्ग या घाटातून जातो. पूर्वी घाटासह हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे होता. या रस्त्याचे चौपदरीकरण होणार असल्याने हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला आहे. रस्त्याचा वापर करणार्‍यांच्या द‍ृष्टीने विचार केला, तर रस्त्यावर मालकी कोणाची? यापेक्षा सुरक्षितता हाच मुद्दा अधिक मोलाचा आहे.

आंबा घाट सुरू होताच वळणे आणि तीव्र उतारही सुरू होतात; पण संरक्षक कठड्यांचा मात्र अभाव दिसून येतो. एकूण स्थिती स्वत:च सांगते की, वर्षानुवर्षे इकडे कुणी लक्षच दिलेले नाही. दिशादर्शक व सूचना फलकांची स्थिती, कोसळलेल्या दरडीच्या खरमातीचे ढिगारे घाटाची कशी वाट लागली आहे, ते जणू ओरडून ओरडून सांगतात!

उरल्यासुरल्या संरक्षक कठड्यांवर वेली, वनस्पतींचे अच्छादन आहे. त्यामुळे कठडे दिसतही नाहीत. कोसळलेल्या दरडींच्या खरमातीने अनेक ठिकाणी निम्मा रस्ता व्यापलेला आहे. वाहन घसरण्याचा धोका असतोच, रस्ताही अपुरा पडतो. सध्या या घाटात काही ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे; पण ते नाममात्र आहे. आभाळ फाटलेले असताना काही ठिगळे लावण्यासारखी परिस्थिती आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news