कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉकडाऊन जून महिन्यापासून शिथिल करण्यात आल्यानंतर अहमदनगर गुन्हेगारी जिल्ह्यात अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे. जून ते सप्टेंबर या मागील चार महिन्यात तब्बल 156 गुन्हे दाखल झाले आहेत. चालू वर्षात जिल्ह्यात 301 गुन्ह्यांची नोंद झाली असून, मागील वर्षीपेक्षा या वर्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या मात्र सध्या कमीच आहे.
नगर जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात गुन्ह्यांची संख्या घटली होती. मात्र, अनलॉकनंतर गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोर्या, दरोड्यांच्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. तर दुसरीकडे अपहरणाच्या गुन्ह्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात 156 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 89 गुन्ह्यांची उकल झाली असून, 67 गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
मागील वर्षी सन 2020 मध्ये जिल्ह्यात 355 अपहरणाचे गुन्हे दाखल झाले होते. यातील 324 गुन्ह्यांची उकल झालेली असून, 31 गुन्हे प्रलंबित आहेत. यंदा मात्र मागील वर्षीपेक्षा दाखल गुन्ह्यांची संख्या तुलनेने कमी आहे. चालू वर्षात सप्टेंबर अखेर 301 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 211 गुन्ह्यांची उकल झाली असून, 67 गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
मागील तीन-चार महिन्यांपासून प्रेमीयुगुले सैराट होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे.
या घटनांनंतर पालकांकडून अपहरणाच्या तक्रारी केल्या जात आहेत. अपहरणाच्या दाखल गुन्ह्यांमध्ये अशाच प्रकरणांची संख्या अधिक असल्याने व पळून गेलेल्या प्रेमीयुगुलांच्या तपासाठी पालकांकडून होत असलेल्या पाठपुराव्यामुळे पोलिस प्रशासनाचीही डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत अशा तक्रारींचे प्रमाण वाढत आहे.