इटानगर; वृत्तसंस्था : भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये अरुणाचल सेक्टरवर प्रचंड वादावादी झाली. दोन्ही बाजूंचे सैनिक एकमेकांच्या अंगावर धावून आले. चिनी सैनिक मागे हटत नाहीत तोवर भारतीय जवानांनी त्यांचा पिच्छा पुरविला. अखेर चिनी नरमले आणि चर्चेला तयार झाले. दोन्ही बाजूंच्या सैन्याधिकार्यांमध्ये चर्चा होऊन अखेर हानी टळली.
एनआयएने दिलेल्या वृत्तानुसार, संरक्षण खात्यातील सूत्रांकडूनच ही माहिती देण्यात आली. अरुणाचल सेक्टरवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये वादावादी झाली. तथापि कुठल्याही प्रकारची हानी त्यामुळे झाली नाही. एएनआयच्या वृत्तानुसार दोन्ही बाजूंच्या सैन्याधिकार्यांत काही तास या विषयावर चर्चा झाली. विद्यमान संकेताबरहुकूम वाद मिटविण्यात आला.
दोन्ही देशांचे सैनिक ठरल्याप्रमाणे आपापल्या भागांतून गस्त घालत असतात. दोन्ही देशांच्या गस्ती पथकांचा समोरासमोर सामना होतो, तेव्हा दोन्ही देशांनी संमती दिलेल्या संकेतांच्या तसेच पद्धतीच्या हिशेबाने या परिस्थितीत ताळमेळ साधला जातो आणि परिस्थिती हाताळली जाते.
याआधीही चालू वर्षातील ऑगस्ट महिन्यातच भारत आणि चीनने गोगरा हाईटस् परिसरातून आपापल्या सैनिकांना माघारी बोलावून घेतले पान 1 वरून : होते आणि आपापल्या नियमित व कायमस्वरूपी तळांवर परतायला सांगितले होते. दोन्ही बाजूंचे सैनिक तेव्हा आपापल्या तळांवर परतलेही होते. लष्करी चर्चेच्या बाराव्या फेरीत भारत आणि चीन दोघेही '17 ए' गस्तीच्या ठिकाणावरून मागे हटण्यावर सहमत झाले होते. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये वाद होणार्या काही स्थळांपैकी हे एक स्थळ आहे, हे येथे उल्लेखनीय! उत्तराखंड राज्यातील बाराहोतीतही 30 ऑगस्ट रोजी चीनचे सैनिक सीमा पार करून भारतीय हद्दीत घुसले होते. पाच किलोमीटर आत येऊन भारतीय हद्दीतील पुलाची तोडफोडही चिनी सैनिकांनी केली होती. भारतीय जवानांना हा प्रकार समजल्यानंतर ते घटनास्थळाकडे रवाना झाले. चिनी सैनिकांना याची कुणकूण लागताच त्यांनी काढता पाय घेतला होता. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांदरम्यान एप्रिल 2020 पासूनच तणावाची स्थिती आहे. दीड वर्ष उलटूनही भारत-चीन सीमेवर सारखा तणाव आहे.