![युवकांनी राजकारणात यावे, घराणेशाही संपुष्टात येईल : पंतप्रधान मोदींचे आवाहन](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F01%2FCopy-of-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2-3.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक ; पुढारी ऑनलाइन डेस्क -भारत हा मदर ऑफ डेमोक्रसी आहे. लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीत देशातील युवकांचा सहभाग जितका अधिक वाढेल तितके देशाचे भविष्य उज्वल होईल. या देशाचा युवक हा या देशाचे सामर्थ्य आहे. देशाच्या उज्वल भविष्यासाठी युवकांनी राजकारणात यायला हवे. भारतीय युवा राजकारणात आल्यास घराणेशाहीतील राजकारण संपुष्टात येईल असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना केले.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते आज शुक्रवारी (दि. १२) नाशिकमध्ये २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होत आहे. त्यापूर्वी तपोवन येथे झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींनी युवकांना संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आदी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, राजकारणातील घराणेशाहीमुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. जे तरुण राजकारणात येणार नाहीत त्यांनी किमान मतदान हे करायलाच हवे, जे युवक पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, ते परिवर्तन घडवून आणू शकतात. त्यामुळे मतदार यादीत आपले नाव येण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रीया पू्र्ण करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. मतदान करुन देशाच्या विकासात आपला सहभाग नोंदवा. त्यासाठी जास्तीत जास्त मतदान करा असे मोदी म्हणाले.
देशातील युवक जेव्हा आपल्या अधिकारांसोबतच आपल्या कर्तव्याचे पालन करेल तेव्हाच देश व समाजाची उन्नती होईल. त्याचाठी युवकांनी मेड इन इंडिया प्रोडक्टचा वापर करावा, कोणत्याही प्रकारच्या आमली पदार्थांचे सेवन करु नका. तसेच आई-बहिणीच्या नावाने शिव्या देणे बंद करा असे आवाहन मोदींनी यावेळी युवकांना केले.