नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आरक्षणाची ५०% मर्यादा हटवतील का?, असा सवाल काँग्रेसने शुक्रवारी (३ मे) पुन्हा एकदा विचारला. काँग्रेसने सत्तेत आल्यावर आरक्षणाची ५० % मर्यादा हटवणार अशी हमी जाहीरनाम्यात दिली आहे. यावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदी आणि भाजपला अगोदरही घेरले होते. त्यानंतर आज पुन्हा पंतप्रधान मोदी यांच्यावर घणाघात केला.
काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवर व्हिडिओ पोस्ट करून पंतप्रधानांना आरक्षणावरून प्रश्न विचारला. पंतप्रधानांना प्रश्न विचारताना रमेश म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयाने मागच्या ३२ वर्षांपासून आरक्षणावर ५० टक्के मर्यादा ठेवली आहे. ती मर्यादा तुम्ही हटवणार की नाही? हे देशाला सांगा."
दरम्यान, निवडणूक प्रचारात आरक्षण आणि संविधानावर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. याअगोदर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन केले होते. तर काँग्रेस पक्ष एससी-एसटी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढवण्यासाठी घटनादुरुस्ती करण्याबाबत बोलत आहे.