हवामान : मान्सून अंदाजाचा दिलासा

हवामान : मान्सून अंदाजाचा दिलासा

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून वेगाने वाढू लागलेल्या उष्णतेच्या झळांमध्ये भारतीय हवामान खात्याकडून आलेला मान्सूनविषयीचा अंदाज गारवा देणारा ठरला आहे. यंदा सरासरीसह 106 टक्के पर्जन्यमान राहील. तसेच अल निनोचा प्रभाव ओसरत जाईल. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने पावसाच्या प्रमाणाच्या श्रेणी ठरवल्या आहेत. त्यानुसार 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुसर्‍या श्रेणीत 90 ते 95 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसर्‍या श्रेणीत 96 ते 104 टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. यंदाच्या हंगामात तिसर्‍या श्रेणीतील पावसाचे भाकीत करण्यात आले आहे. त्यातही पावसाळा सुरू झाल्यावर अल निनोचा प्रभाव संपला असेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. हवामान विभागाचा पहिला दीर्घकालीन अंदाज आहे. पुढचा सुधारित पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी वर्तवण्यात येणार आहे; पण सध्याचे एकूण उष्णतामान आणि पॅसिफिक महासागरावरील स्थिती पाहता यामध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. मागील काळात जानेवारी-फेब्रुवारी-मार्च या महिन्यांमध्ये झालेल्या गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे तसेच जून महिन्यात आलेल्या चक्रीवादळांमुळे मान्सूनचे आगमन, वाटचाल यामध्ये व्यत्यय येत गेला होता. यंदा तशी स्थिती दिसत नसल्याने मान्सून मनसोक्त बरसेल, असे दिसते आहे.

देशातील सर्वसामान्य लोक, शेतकर्‍यांनाच नव्हे, तर अर्थतज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांनादेखील पावसाची प्रतीक्षा असते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चांगला पाऊस पडावा, अशी मनोकामना ते करत असतात. हवामान खात्याची भविष्यवाणी खरी ठरली तर देशाच्या अर्थव्यवस्थेसह शेतकरी आणि शेतीला 'अच्छे दिन' येऊ शकतात. पाऊस सामान्य राहिला तर पिके चांगली येतील आणि ही बाब महागाई दराला खाली आणण्यासाठी मदत करू शकते. यामुळे ग्रामीण भागात उलाढाल वाढेल आणि त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था रुळावर येण्यास हातभार लागेल.

चांगल्या पावसाचा परिणाम खरीप पिकांच्या उत्पादनावर होतो आणि त्यामुळे काही विशेष खाद्यान्नाचे भाव कमी होऊ शकतात. तांदूळ, बाजरी, कापूस, मका, सोयाबीन आदी खरीप पिके असून, त्यांचे उत्पादन बहुतांशवेळा चांगल्या पावसावर अवलंबून असते. त्यांची पेरणी जून, जुलैपासून सुरू हेते. अशावेळी पाऊस चांगला राहिला, तर त्यांचे उत्पादन वाढेल आणि महागाईवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे. महागाई कमी झाली तर अर्थव्यवस्थेला फायदा मिळेल. एकुणातच पाऊस हा शेतकर्‍यांची जीवनरेखा आहे. एका अंदाजानुसार, पावसावर 2 खर्व डॉलरची अर्थव्यवस्था अवलंबून असते आणि किमान 50 टक्के कृषी क्षेत्राला पाणी हे पावसातूनच मिळत असते. सद्यस्थितीत भारतात सुमारे 800 दशलक्ष नागरिक ग्रामीण भागात राहतात आणि ते शेतीवर अवलंबून असून, त्यांचा भारताच्या जीडीपीमधील वाटा 14 टक्के आहे.

पाऊस कमी पडला तर देशाच्या विकासाला आणि अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. सामान्यापेक्षा अधिक पाऊस राहिल्याने कृषी उत्पादन आणि शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ होते. त्यामुळे ग्रामीण भागात उत्पादनाला मागणी वाढते. चांगला पाऊस हा केवळ कृषी क्षेत्रासाठीच आवश्यक नाही, तर उद्योग जगालादेखील सुगीचे दिवस येतात. शेतीपासून ते जेवणाच्या टेबलपर्यंत एक मोठी साखळी असते आणि त्यात कमी पाऊस हा संपूर्ण साखळी विस्कळीत करू शकतो. त्यामुळे आर्थिक व्यवहार कोलमडू शकतात. 2024 मध्ये पाऊस चांगला पडण्याची शक्यता वर्तविली जात असताना सरकारने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आणखी हास्य फुलविण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलणे गरजेचे आहे.

तूर्त देशात चांगला पाऊस हा विकासाची रेषा मानली जात आहे. कारण, पावसाचा प्रभाव हा देशातील कोट्यवधी लोकांच्या रोजीरोटीचा आणि दैनंदिन जीवनावर पडत असतो. चार महिन्यांचा पावसाळा हा अर्थव्यवस्थेसाठी एकप्रकारे मलम म्हणून सिद्ध होऊ शकतो. पिकाच्या उत्पन्नातून खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव निश्चित होतात आणि चांगले पीक आले तर खाद्यपदार्थांच्या किमती कमी राहतात आणि त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल.

पाऊस हा खरीप पिकांना लाभदायी ठरतोच, त्याचबरोबर रब्बी पिकांनादेखील उपयुक्त ठरतो. रब्बी हंगामात पिकाची लागवड करताना हिवाळ्यात जमिनीत ओलावा राहण्यासाठी पडून गेलेला चांगला पाऊस पूरक ठरतो. दमदार पाऊस हा देशातील पाणीसाठ्यात वाढ करतो आणि त्यामुळे शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी मिळते. एवढेच नाही, तर आरबीआय व्याज दर निश्चित करताना पावसाचे प्रमाण, खाद्योत्पादन आणि महागाई दरावर लक्ष केंद्रस्थानी ठेवते. परिणामी, चांगला पाऊस हा व्याज दरात घसरण आणू शकतो आणि कर्ज स्वस्त होऊ शकते. आर्थिक विकास दर वाढण्यास पावसाचा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे महागाई वाढणार नाही आणि त्याचवेळी विकास दरदेखील वाढेल. चांगल्या पावसामुळे शेतकर्‍यांना चांगले पीक मिळेल आणि त्यांची क्रयशक्ती वाढेल आणि त्यांची सक्रियता ही बाजाराची रौनक वाढवेल.

सध्या देशात महागाई हा कळीचा मुद्दा ठरला आहे. देशात शेतकर्‍यांना शेती करणे खूपच महागाचे ठरत आहे. बियाणे, खत, डिझेलच्या भावात वाढ झाल्याने शेतकर्‍यांना शेती करणे खूपच कठीण होऊ लागले आहे. वाढती महागाई ही शेतकर्‍यांना शेतीतील रस कमी करत आहे. कारण, शेती करणे हा तोट्याचा व्यवसाय वाटत आहे. शेतकर्‍यांना खर्च काढणेदेखील कठीण वाटत आहे. डिझेलच्या किमती वाढल्याने शेतकरी अगोदरच त्रस्त आहे. शेतीची कामे डिझेलवरच अवलंबून असतात. शेतीची मशागत ते कापणीपर्यंत तसेच भाजी मंडईपर्यंत शेतकरी लहान ट्रॅक्टरचा वापर करतात आणि महागडे डिझेल हे शेतकर्‍यांचे उत्पन्न कमी करत आहे. त्यामुळे ही एक मोठी समस्या ठरत आहे. अशावेळी पाऊस कमी पडला तर स्थिती आणखीच नाजूक हेाऊ शकते.

कमी उत्पन्नामुळे धान्य, फळ, भाजीपाला आणि दूध यासारख्या दैनंदिन लागणार्‍या वस्तूंच्या किमती आणखी वाढू शकतात. मात्र, चांगला पाऊस पडल्याने महागाईवर अंकुश बसू शकतो. तसेच खते, बियाणे, ऑटोमोबाईल, कन्झ्युमर गुडस्, फायनान्स कंपन्यांच्या शेअरनादेखील मागणी राहते. याप्रमाणे चांगला पाऊस हा शेअर बाजारावरही सकारात्मक परिणाम करतो. पावसामुळे तलाव भरतात आणि ही बाब हायड्रोपॉवर आणि सिंचनासाठी आवश्यक असते. ज्याप्रमाणे पाऊस हा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याचप्रमाणे कॉर्पोरेट कंपन्यांपासून ते कन्झ्युमरपर्यंत समावेश असलेल्या व्यक्तीचे वैयक्तिक उत्पन्न आणि बचतीवरदेखील पाऊस परिणाम करतो. त्यामुळे चांगला मान्सून हा देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक ठरतो. या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी आणि प्रशासनाने तयारीच्या कामांना गती दिली पाहिजे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news