पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहली याने आसीसीच्या अनेक स्पर्धांमध्ये भारताचे कर्णधार म्हणून नेतृत्व केले. चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७, वनडे विश्वचषक २०१९ आणि २०२१ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये तो भारताचा कर्णधार होता. मात्र, प्रत्येक वेळी तो भारताला चॅम्पियन बनवण्यात यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे माजी खेळाडू आणि चाहते त्याला अयशस्वी कर्णधार मानतात. याबाबत विराट कोहलीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Virat Kohli on Captaincy)
विराट कोहली याबाबत बोलताना म्हणाला, आयसीसी स्पर्धांमध्ये सेमी फायनल आणि फायनलमध्ये पोहोचल्यानंतरही माझे वर्णन 'अपयश कर्णधार' असे करण्यात आले. विराट कोहलीने गेल्या वर्षी सर्व फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडले होते. तो म्हणाला, "तुम्ही स्पर्धा केवळ जिंकण्यासाठी खेळता. मी २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नेतृत्व केले तेव्हा भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली होती. २०१९ च्या विश्वचषकातही उपांत्य फेरीत पोहोचलो होतो. (Virat Kohli on Captaincy) मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचे नेतृत्व केले. तरीही आयसीसीच्या चार स्पर्धांनंतर मला अपयशी कर्णधार मानले गेले.
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २०१९ च्या विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्येही भारताला न्यूझीलंडविरोधात पराभवाचा सामना करावा लागला. (Virat Kohli on Captaincy) या शिवाय २०२१ मध्ये खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही न्यूझीलंडने भारताला मात दिली होती.
विराट म्हणाला, "मी एक खेळाडू म्हणून विश्वचषक जिंकला आहे. मी एक खेळाडू म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्या दृष्टीकोनातून बघितले तर असे लोक होते की, ज्यांना कधीच विश्वचषक जिंकता आला नाही. विराटने २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकाची आठवणही यावेळी बोलताना करून दिली. जेव्हा महेंद्रसिंग धोनीने वानखेडे स्टेडियमवर भारताला विजेतेपद मिळवून दिले. (Virat Kohli on Captaincy)