![sukh mhanje nakki kay ast](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F06%2Fgauri-2.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा (Vat Purnima) म्हणून साजरी केली जाते. पती-पत्नीच्या नात्यातला गोडवा वाढवणारा हा सण. या दिवशी वडाची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाहच्या मालिकांमध्येही वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळणार आहे. (Vat Purnima)
वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने साक्षात यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले अशी आख्यायिका आहे. सावित्रीप्रमाणेच सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरीही जयदीपच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करणार आहे. रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा आणि कार्तिकच्या नात्यात तणाव कायम असला तरी दीपाचं कार्तिकवरील प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. कार्तिक आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी दीपा देखिल वटपौर्णिमा साजरी करणार आहे.
स्टार प्रवाहच्या नायिकांप्रमाणेच नायकही वटपौर्णिमेचं व्रत करताना दिसणार आहेत. पिंकीचा विजय असोमध्ये पिंकीने वटपौर्णिमेचं व्रत करु नये, यासाठी सुशीलाचे प्रयत्न सुरु आहेत. पिंकीचं व्रत पूर्ण व्हावं यासाठी युवराज पुढाकार घेणार आहे.
पिंकीला आपल्या खांद्यावर बसवून पिंकीसोबत युवराजही वडाच्या झाडाभोवती सात फेरे घेणार आहे. युवराजप्रमाणेच शुभविवाह मालिकेतील आकाश भूमीसोबत वटपौर्णिमेची पूजा करणार आहे. मुरांबा मालिकेतील अक्षयही रमासाठी वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे.
मन धागा धागा जोडते नवा आणि शुभविवाह या मालिकांमध्येही वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळणार आहे.