विसर्जन मिरवणूक काळात राजगुरूनगर बाह्यवळण रस्त्याचा वापर

विसर्जन मिरवणूक काळात राजगुरूनगर बाह्यवळण रस्त्याचा वापर

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : वाहतूक कोंडीने नेहमी गजबजलेल्या राजगुरूनगर शहरात गणपती विसर्जनाच्या पूर्ण दिवसभर म्हणजे शुक्रवारी 9 सप्टेंबरला  पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक नव्याने तयार होणाऱ्या व काही अंशी काम अपूर्ण असलेल्या राजगुरूनगर बाह्यवळण रस्त्यावरून वळविण्यात येणार आहे. ही माहिती खेडचे पोलिस निरीक्षक सतिशकुमार गुरव यांनी दिली.
पोलिस निरीक्षक गुरव यांनी सांगितले की, नाशिककडून पुण्याकडे जाणारी वाहतूक ही तुकाईवाडी येथून नवीन बाह्यवळणमार्गे चांडोली येथील कडुस फाटा अशी करण्यात आली आहे. तुकाईवाडी येथून सध्या कार्यरत असलेल्या मार्गावर फक्त एसटी बस तसेच स्थानिक नागरिकांची वाहने सोडण्यात येणार आहेत. तर पुण्याकडून नाशिककडे जाणारी वाहतूक ही जुन्या महामार्गानेच सुरू ठेवण्यात येणार आहे.

शहरांतर्गत असलेला मुख्य मिरवणूक मार्ग म्हणजेच वाडा रस्ता होय. या रस्त्यावर येणारी वाहतूक ही पाण्याची टाकी व पंचायत समिती चौक येथून तिन्हेवाडी रस्त्याने तिन्हेवाडी मार्गे पानमळा येथे पुन्हा महामार्गावर वळवण्यात येणार आहे. हुतात्मा राजगुरू नावाने ओळखला जाणाऱ्या भीमा नदीवरील नवीन पुलावरून विसर्जन घाटाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तसेच पाण्याच्या टाकीपासून ते भीमा नदी तीरावरील विसर्जन घाट हा रस्ता शुक्रवारी दुपारी चार वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत बंद करण्यात येणार आहे, असे सतिशकुमार गुरव म्हणाले.

राज्यपालांच्या दौऱ्यात पहिल्यांदा वळवली होती वाहतूक

राजगुरूनगर शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. कोणताही सण, यात्रा महोत्सव किंवा राजकीय नेते, अधिकारी यांच्या भेटी अथवा सभेच्या, दौऱ्यावेळी येथील वाहतूक कोंडी आणखी जटिल बनते. हुतात्मा राजगुरू यांची ११४ जयंती २४ ऑगस्टला साजरी झाली. या निमित्ताने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अभिवादन करण्यासाठी आले होते. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी यावेळी नव्याने तयार होणाऱ्या बाह्यवळण कामातील तयार रस्त्यावरून ही वाहतूक पहिल्यांदा वळवण्यात आली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news