![मुसळधार पाऊस](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F04%2F%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ८ गावांतील २२ शेतकऱ्यांच्या सुमारे २१.२ हेक्टरवरील शेती पिकांचे पावसामुळे नुकसान झाले. एप्रिलनंतर मे मध्येही अवकाळी पावसाची हजेरी कायम आहे. गुरुवारी जिल्ह्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे विविध तालुक्यांधील गावांतील उन्हाळी धानासह रब्बी हंगामातील गहू आणि आंबा पिकाला जबर फटका बसला आहे.
गुरूवारला जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच सोसाट्याच्या वा-यासह दमदार पावसाने हजेरी लावली. सुमारे तासाभराहून अधिक काळ झालेल्या या दमदार पावसाने शहरासोबतच ग्रामीण भागातीलही जनजीवन अस्तव्यस्त केले. शहरामध्ये अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली.
ग्रामीणमध्येही या अवकाळी पावसामुळे झाडांच्या पडझडीसोबतच वीज पडून एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाले. रब्बीचे बहुतांशी पीक निघाल्यामुळे शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झालेले नाही.
परंतु, कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील रामटेकमधील २ गावात आणि मौद्यातील ६ गावात अशा दोन्ही ठिकाणच्या ८ गावांतील २२ शेतकऱ्यांच्या सुमारे २१.२ हेक्टरवरील शेती पिकांचे या पावसामुळे नुकसान झाले. यामध्ये उन्हाळी धानासोबतच गहू, आंबा आणि भाजीपाला पिकांचाही समावेश असल्याची माहिती आहे. नुकसानीची आकडेवारी अंतिम अहवालामध्ये वाढण्याची शक्यता आहे.