मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : युक्रेनमध्ये अडकलेल्या १८२ विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाच्या विशेष विमान आज (दि. ०१) मंगळवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. (russia ukraine war)
बुखारेस्ट, रोमानिया येथील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित घेऊन एअर इंडियाचे विमान परतले आहे. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मंत्री नारायण राणे विमानतळावर पोहोचले.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने एअर इंडियासह ऑपरेशन गंगा हाती घेतली आहे. भारतीयांना युक्रेन घेऊन परतणारे ही सातवी फ्लाईट आहे. आता पर्यंत ६०० विद्यार्थीना मायदेशात परत आणण्यात आले आहे.
यावेळी मंत्री नारायण राणे म्हणाले की, ऑपरेशन गंगा मोहिमेअंतर्गत भारतीयांना युक्रेनमधून मायदेशी आणण्यात आले. आज १८२ विद्यार्थी दाखल झाले. सरकारच्या वतीने मी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यासाठी राज्य सरकारने व्यवस्था केली आहे.
विद्यार्थी थोडे दडपणाखाली जाणवत होते, त्यांच्याशी बोलून त्यांना धीर दिला. भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी पंतप्रधानांनी ४ मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांचे विशेष दूत म्हणून पाठवल्याचेही राणे यांनी सांगितले.
भारतीय दुतावासाच्या संपर्काने आम्ही सीमेवर पोहोचलो, तेथून आम्हाला विशेष विमानाने मायदेशी आणण्यात आले. मायदेशी परतल्याचा आनंद शब्दातीत आहे, अशा भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.