कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठ उन्हाळी सत्र परीक्षेंतर्गत मार्च-एप्रिल 2024 च्या परीक्षा सुरू आहेत. बी.कॉम. भाग-3 च्या 'अॅडव्हान्स अकौंटन्सी पेपर तीन'च्या प्रश्न दोनमधील ए आणि बी असे 16 गुणांचे दोन प्रश्न चुकीचे आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. चुकीचे प्रश्न सोडविताना गोंधळ उडाल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठ परीक्षा विभागाच्या वतीने उन्हाळी सत्रातील परीक्षा सुरू आहेत. सोमवारी (दि. 1) टी.वाय.बी.कॉम. भाग तीनचा अडव्हान्स अकौंटन्सी पेपर तीनचा पेपर सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेत झाला. पेपर सुरू झाल्यावर प्रश्न क्र. दोनमधील ए व बी हे दोन प्रश्न चुकीचे असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. पेपर लिहिताना विद्यार्थ्यांना गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांनी तत्काळ याबाबतची माहिती परीक्षा केंद्रप्रमुखांना दिली. त्यांनी शिवाजी विद्यापीठ परीक्षा विभागाला कळविले.
परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालकांनी बी.कॉम.च्या पेपर सेटरशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यांना परीक्षा विभागाने ई-मेल करून विद्यार्थ्यांकडून आलेल्या तक्रारीचा खुलासा करण्याबाबत सूचित केले आहे. तसेच विद्यार्थ्यांची तक्रार बी.कॉम. अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांकडे दिली आहे. संबंधित प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करून विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.
चुकलेल्या प्रश्नांचे सरसकट 16 गुण द्या
विद्यार्थी परीक्षेला पाच मिनिटे उशिरा आले तर त्यांना परीक्षेला बसू दिले जात नाही; मग प्रश्नपत्रिकेतील पेपर सेटरच्या चुकांची शिक्षा विद्यार्थ्यांना का? असा सवाल परीक्षार्थ्यांनी केला आहे. यात विद्यार्थ्यांची चूक नसल्यामुळे पुन्हा परीक्षा न घेता प्रश्न क्र. दोनचे 16 गुण सरसकट विद्यार्थ्यांना द्यावेत, अशी मागणी होत आहे.