पुणे, पुढारी वृत्तसेवा: स्वराज्याचे तोरण बांधलेल्या किल्ल्यावर राज्याच्या पुरातत्व विभागाकडून आता डागडूजीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पावसाळ्याच्या आतच करण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याने काम युध्दपातळीवर सुरू आहे.
सध्या राज्य पुरातत्व विभागाने तोरणा गडावरील ढासळलेले बुरूज दुरूस्तीची कामे सुरू केली असून, पथ दुरूस्ती सुध्दा करण्यात येत आहे. त्यासोबतच तोरणा गडावरील बिनी दरवाजा, मेंगाई मंदिराचे डागडुजीचे काम सुरू आहे. लवकरच हे काम पुर्ण होईल, असे पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.
शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावरून नुकतीच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील किल्यांच्या विकासासाठी भरघोस निधीचे देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार आता राज्यातील विकास न झालेल्या किल्यांचा विकास करण्याचे शासनाचे नियोजन दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील अनेक दुर्लक्षित किल्ल्यांचा विकास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
किल्ले सिंहगड, रायगड, पुरंदर, शिवनेरी या किल्ल्यांप्रमाणेच राजगड आणि तोरणागडाचा मोठा इतिहास आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोन्ही किल्ले दुर्लक्षित म्हणूनच राहिले आहेत. त्यामुळे शासनाने आता याकडे लक्ष घालून दोन्ही किल्ल्यांचा विकास करणे गरजेचे आहे.
– राजू रेणूसे, सामाजिक कार्यकर्ते, वेल्हा
तोरणागडावर आम्ही डागडूजीची कामे हाती घेतली आहेत. ती तातडीने पुर्ण करण्याचे आमचे नियोजन असून यात तोरणा गडावरील बिनी दरवाजा, मेंगाई मंदिर, पथ आणि ढासळलेले बुरूज बांधणीचे काम सुरू आहे. लवकरच ते पुर्ण होईल.
– डॉ. विलास वाहणे, सहायक संचालक, राज्य पुरातत्व विभाग