![…तर आजच भारत असता जगाची आर्थिक महासत्ता](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F08%2Feconomic.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
आजची वाटचाल अशीच सुरू राहिली तर आगामी काळात भारताचे
पुनश्च हरिओम! आपणच असू की, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था
15 ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण होतील. ब्रिटिशांच्या गुलामगिरीची भारताला आत्मसन्मानाच्याच स्वरूपात नव्हे, तर आर्थिक स्वरूपातही मोठी किंमत चुकवावी लागली. जागतिक कीर्तीच्या प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ ऊत्सा पटनायक यांनी, कोलंबिया विद्यापीठात प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून 200 वर्षांत ब्रिटिशांनी भारताचे सुमारे 369 लाख कोटी रुपये, म्हणजेच 45 ट्रिलियन डॉलर लुटले, हे सप्रमाण सिद्ध केले आहे. ही लूट झाली नसती, तर अमेरिका किंवा चीन नव्हे भारत आज जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता राहिला असता.
सध्या अमेरिका ही 23.3 ट्रिलियन डॉलरसह (जीडीपीसह, एकूण सकल उत्पन्न) जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. 17.7 ट्रिलियन डॉलरसह चीन जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तिसर्या क्रमांकावर जपान आहे, ज्याचा जीडीपी 4.9 ट्रिलियन डॉलर आहे. जर्मनी 4.3 ट्रिलियन डॉलरसह चौथ्या क्रमांकावर आहे. भारत 3.2 ट्रिलियन डॉलरसह पाचव्या क्रमांकावर आहे.
ढोबळमानाने भारताचे सध्याचे 3.2 ट्रिलियन डॉलर व ब्रिटिशांनी लुटलेले 45 ट्रिलियन डॉलर अशी गोळाबेरीज केली, तर ती 48.2 ट्रिलियन डॉलरची आपली अर्थव्यवस्था आज राहिली असती. प्रथमदर्शनी ही लूट करणारा ब्रिटन मात्र (3.1 ट्रिलियन डॉलरसह) सध्या सहाव्या स्थानावर मग का आहे, असा प्रश्न कुणालाही पडणे साहजिक आहे; पण ब्रिटनमधील तत्कालीन लुटारूंचीच पुढे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांतून विभागणी होत गेली, त्यामुळे भारतातून लुटलेला हा पैसाही विभागला गेला, हे त्याचे उत्तर होय.
2015 मध्ये, राज्यसभा खासदार शशी थरूर यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात एक व्याख्यान दिले होते. भारतातून केलेल्या लुटीची भरपाई ब्रिटनने करावी, असे आवाहन थरूर यांनी त्यातून केले होते. आता ब्रिटनच अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारताच्या मागे पडलेला असताना काय खाऊन हे गोरे भरपाई करणार, हाही एक प्रश्नच आहे.
इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर कापड गिरण्या होत्या. पूर्वी अमेरिकेतून कापूस यायचा; पण 1861 मध्ये अमेरिकेत गृहयुद्ध सुरू झाल्याने कापसाचा पुरवठा बंद झाला; मग भारतातून कापूस पुरवठा सुरू झाला. या कापसावर ब्रिटनमध्ये बनलेले कापड भारतात मोठ्या नफ्यावर विकले जाऊ लागले. इंग्रजांनी गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकर्यांना धान्याऐवजी कापूस पिकवण्यास भाग पाडले. 1865 मध्ये अमेरिकेतील गृहयुद्ध संपताच. तेथून इंग्लंडमध्ये कापसाचा पुरवठा सुरू झाला.
भारतातून कापूस खरेदी ठप्प झाली. कापूस पडून होता. 1874 पर्यंत शेतकरी मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाला. ब्रिटिशांनी ठरवून शेतकर्यांना सावकारी कर्जात गाडले. सारा वसूल न झाल्याने इंग्रजांनी शेतकर्यांच्या जमिनींचा लिलाव केला. कर्जफेडीला ब्रेक म्हणून शेतकर्यांचे पीकच विकले जाऊ नये, अशी तजवीज ब्रिटिशांनी केली होती. कवडीमोल भावाने कापूस स्वत: विकत घेतला. खूप नफा
कमावला.
ब्रिटिशांनी भारत बळकावला त्या काळात जगाच्या जीडीपीमध्ये भारताचा वाटा तब्बल 25 टक्के होता. आज तो केवळ 3 टक्के आहे.