कोल्हापूर, डी. बी. चव्हाण : 'गोकुळ'चे लेखापरीक्षण रखडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना आता गोकुळच्या चाचणी लेखापरीक्षणासाठी नव्याने तीन लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर आणखी चार मुद्दे चाचणी लेखापरीक्षणासाठी वाढविण्यात आल्यामुळे राजकीय संघर्षाला धार आली आहे.
नव्याने नियुक्त केलेले तिन्ही लेखापरीक्षक अहमदनगरचे आहेत. वर्ग एक चे एक वर्गचे दोन असे जिल्हा विशेष लेखापरीक्षक कार्यालयातील हे अधिकारी आहेत. तसेच या चाचणी लेखापरीक्षणात आणखी चार मुद्दे वाढले आहेत. या अधिकार्यांचे पथक एकूण 8 मुद्द्यांची चौकशी करणार आहेत.
गोकुळमधील कारभाराची चौकशी करण्याची मागणी संचालिका शौमिका महाडिक यांनी केली. त्यांनी काही तक्रारी सादर केल्या, त्याच्या आधारे पुणे येथील लेखापरीक्षण मंडळाने गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश काढले.
हे चाचणी लेखापरीक्षण करण्यासाठी अहमदनगरचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब मसुगडे यांची नियुक्ती केली आहे. तसेच शासनाने मसुगडे यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून गोकुळला देण्यात आलेल्या निधीचे (आरकेव्ही) लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. मसुगडे यांना गेली पंधरा ते वीस दिवस आरकेव्हीचे काम पूर्ण केले आहे.
त्यानंतर तक्रारीतील मुद्द्यांनुसार चाचणी लेखापरीक्षण करण्यासाठी त्यांनी माहिती मागवली आहे. दरम्यान गोकुळ प्रशासनाने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये वैधानिक लेखापरीक्षांच्या अहवालाचा समावेश आहे. वैधानिक लेखापरीक्षकांच्या अहवालात विस्तृत मुद्दे मांडले आहेत. तसेच तक्रारदार महाडिक यांनी आणखी काही मुद्दे उपस्थित केल्याचे समजते. या मुद्यांच्या तपासणीसाठी आणखी अधिकार्यांची गरज भासल्याने यासाठी आणखी तीन शासकीय लेखापरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
कोल्हापूर विभागातील अधिकार्याचा कामास नकार?
गोकुळमधील टोकाचा संघर्ष स्थानिक अधिकार्यांना माहित आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागातील अधिकार्यांनी चाचणी लेखापरीक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकात काम करण्यास नकार दिल्याचे समजते. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील अधिकार्यांची नियुक्त केल्याची चर्चा आहे.