मुंबई : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) तृतीय श्रेणीच्या पद भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेर प्रश्न विचारण्यात आला नव्हता. त्यामुळे संबंधित प्रश्नपत्रिकेतील तीन प्रश्न गृहीत न धरण्यासंबंधी मॅटने दिलेला निर्णय चुकीचा आहे, असा दावा एमपीएससीने अॅड. आशुतोष कुलकर्णी यांनी सोमवारी उच्च न्यायालयात केला .
एमपीएससीतर्फे सहाय्यक अकाउंट अधिकारी, गट बी या तृतीय श्रेणीतील पदाच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली होती. २०१९ मध्ये त्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षेत अभ्यासक्रमा बाहेरील आणि तीन प्रश्न चुकीचे असल्याने त्याच्या गुणांची मागणी करत या निकालाला आक्षेप घेणारी याचिका भरती प्रक्रियेतील मूळ उमेदवारांनी मॅट मध्ये दाखल केली. या याचिकेची मॅटने गंभीर दखल घेत. परीक्षेतील तीन प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील असल्याचा विद्यार्थ्यांचा दावा मान्य केला. मात्र त्या प्रश्नांसाठी पूर्ण गुण देण्याची मागणी फेटाळून लावत एमपीएससीला अभ्यासक्रमाबाहेरील तीन प्रश्न रद्द करून उर्वरित ९७ टक्के प्रश्नांच्या आधारे मूल्यांकन करा अथवा उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी जेवढे गुण कमी पडतील, तेवढे गुण देण्याचा आदेश दिला.
मॅटच्या या निर्णया विरोधात उमेदवारांनी उच्च न्यायालयात दाद मागत याचिका दाखल केली. या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी एमपीएससीच्या वतीने अॅड. आशुतोष कुलकर्णी यांनी याचिकेला आणि मॅटच्या निर्णयाला जोरदार आक्षेप घेतला.
प्रश्नपत्रिकेत कुठलाही अभ्यासक्रमाबाहेरचा अथवा प्रश्न चुकीचा नसल्याचा दावा केला. तसेच मॅटच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. एमपीएससीची ही विनंती मान्य करत खंडपीठाने मूळ उमेदवार आणि एमपीएससीच्या याचिकेवर दोन आठवड्यांनंतर एकत्रित सुनावणी घेण्याचे निश्चित केले.