कोल्हापूर : जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होत असताना मात्र, महापालिका, नगरपालिकेची यंत्रणा सुस्त आहे. श्वान निर्बीजीकरण करणारी यंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे. 4 मार्च रोजी शहरातील तरुणीचा जीव रेबीजमुळे गेला. ही घटना घडल्यानंतर देखील संबंधित यंत्रणेचे डोळे घडलेले नाहीत. गल्लीबोळात नव्हे, तर भर रस्त्यामध्ये फिरणे देखील अवघड झाले आहे. कुत्र्यांनी 17 दिवसांत 442 जणांचे लचके तोडले.
कसबा बावडा, कनाननगर, शाहूपुरी, न्यू शाहूपुरी, सीबीएस स्टॅड, राजारामपुरी, टाकाळा चौक, टेंबलाईवाडी, मार्केट यार्ड, भाऊसिंगजी रोड, मटण मार्केट, सायबर चौक, जवाहरनगर, आरकेनगर, पाचगाव, संभाजीनगर, कळंबा रोड, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, रंकाळा चौपाटी, मिरजकर तिकटी, बुधवार पेठ, सोमवार पेठ, दुधाळी, शिवाजी पेठ, सानेगुरुजी वसाहत, लक्षतीर्थ वसाहत, नानापाटील नगर, बोंद्रेनगर, अंबाई टँक, देवकर पाणंदसह परिसरात कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे.
सीपीआर भयभीत : महापालिका यंत्रणा सुस्तच
सीपीआरमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. प्रत्येक इमारतीत पाच ते सहा मोकाट कुत्री कळपाने वावरत आहेत. येथील वॉर्ड त्यांचे हक्काचे ठिकाण बनले आहेत. येथे उपचारासाठी येणार्या रुग्णांना जीव मुठीत धरून रुग्णालयात यावे लागते. इतकी भयावह परिस्थिती येथे आहे. रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर, नर्सेस यांच्यासह कर्मचार्यांवर ही कुत्री हल्ला करत आहेत. तरी देखील महापालिका सुस्तच आहे.
ग्रामीण भागातही दहशत
इचलकरंजी शहर, हातकणंगले, शिरोळ, जयसिंगपूर, पेठवडगाव, कळे, गडहिंग्लज, पन्हाळा, कोडोली, कुडित्रे, कोपार्डे, सांगरूळ, आजरा, शाहूवाडी, मलकापूर, बांबवडे, साळवण, गगनबावडा स्टँड, चंदगड, गारगोटी स्टँडसह परिसरात, भुदरगड, राधानगरी, कागल एसटी स्टँडसह शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून, त्यांनी दहशत निर्माण केली आहे. बाजारपेठेच्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा ठिय्याच आहे.