तेलंगणा विधानसभा निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र असले तरी हळूहळू भाजप स्पर्धेतून बाहेर पडत असल्याची चर्चा आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी भाजपमध्ये सामील झालेले माजी आमदार राजगोपाल रेड्डी यांनी काँग्रेसची वाट धरल्याने भाजपला खिंडार पडले आहे. काँग्रेसचे बोंगीरचे खासदार वेंकट रेड्डी यांचे छोटे बंधू असलेल्या राजगोपाल काही काळापूर्वी मुनुगोडे मतदारसंघातून पोटनिवडणुकीत निवडणूक लढवली होती; पण त्यांना बीआरएसचे नेते प्रभाकर रेड्डी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. भाजपने उमेदवारांची जी पहिली यादी जाहीर केली होती, त्यात राजगोपाल रेड्डी यांचे नाव नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या तेलंगण दौर्यावेळी राजगोपाल रेड्डी कुठेही दिसले नव्हते. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस रेड्डी यांना तिकीट देणार काय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.