![IND vs AUS : टीम इंडियाच्या सामन्याचे ठिकाण बदलणार! ‘हे’ मोठं कारण आलं समोर](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F11%2FCric1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AUS T20 : भारतीय संघ 2023 च्या वनडे विश्वचषकात आपल्या शानदार खेळाने सर्वांना प्रभावित करत आहेत. सलग आठ सामने जिंकून रोहित सेनेने 16 गुणांची कमाई करत गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. यासह टीम इंडियाने आरामात सेमीफायनल गाठली आहे. भारतीय संघाचा शेवटचा नववा सामना 12 नोव्हेंबरला नेदरलँडविरुद्ध खेळवला जाणार आहे. दरम्यान, वनडे विश्वचषक संपल्यानंतर लगेचच, भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध मायदेशात 5 सामन्यांची द्विपक्षीय टी-20 मालिका खेळणार आहे. 23 नोव्हेंबरपासून सुरू होणा-या या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळवला जाईल. तर मालिकेतील शेवटचा सामना 3 डिसेंबरला हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र हा सामना आता वेगळ्या मैदानावर खेळवण्यात येणार असल्याची बातमी समोर येत आहे.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे, त्यामुळे या सामन्याच्या आयोजनासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवणे पोलिसांसाठी असचणीसे असेल. अशा परिस्थितीत मालिकेतील हा पाचवा सामना हैदराबादऐवजी बंगळूरमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ लगेचच द. आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. त्यामुळे टीम इंडियातील अनेक वरिष्ठ खेळाडू कांगारूंविरुद्ध खेळताना दिसणार नसल्याचे समजते आहे. अर्थात या मालिकेसाठी टीम इंडियाची अद्यापतरी घोषणा करण्यात आलेली नाही. पण दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा झाली असून अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका 23 नोव्हेंबरपासून विशाखापट्टणमपासून सुरू होणार आहे, तर दुसरा सामना 26 नोव्हेंबरला त्रिवेंद्रममध्ये होणार आहे. याशिवाय तिसरा सामना 28 नोव्हेंबरला गुवाहाटीमध्ये, चौथा सामना 1 डिसेंबरला नागपुरात आणि शेवटचा सामना 3 डिसेंबरला होणार आहे.
मॅथ्यू वेड (कर्णधार, यष्टिरक्षक), जेसन बेहरनडॉर्फ, शॉन अॅबॉट, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिश, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा.