पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. टीम इंडिया या हंगामाची सुरुवात कांगारूंविरुद्धच्या टी-20 मालिकेने करणार आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. या कालावधीत एकूण नऊ सामने होतील. टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने टी-20 मालिकेसाठी दोन मोठ्या संघांना पाचारण केले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी 20 सामना 20 सप्टेंबरला मोहालीत येथे, दुसरा टी 20 सामना 23 सप्टेंबरला नागपुरात आणि तिसरा टी 20 सामना 25 सप्टेंबरला हैदराबादमध्ये खेळवला जाईल. यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी 20 सामना 28 सप्टेंबरला त्रिवेंद्रममध्ये, दुसरा टी 20 सामना गुवाहाटीमध्ये 2 ऑक्टोबरला आणि तिसरा टी 20 सामना 4 ऑक्टोबरला इंदूरमध्ये खेळवला जाईल. यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळणार आहे.
वनडे मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबरला लखनौमध्ये, दुसरा सामना 9 ऑक्टोबरला रांचीमध्ये आणि तिसरा सामना 11 ऑक्टोबरला दिल्लीत खेळवला जाईल. ही एकदिवसीय मालिका 2020 मधील रद्द झालेल्या एकदिवसीय मालिकेची रिप्लेसमेंट आहे. वास्तविक, 2020 मध्ये कोरोनामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका रद्द करण्यात आली होती. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. आता तिच मालिका या वर्षी ऑक्टोबरमध्ये खेळवली जाणार आहे.