पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषक २०२२ ग्रुप एकमधील सेमी फायनल ( उपांत्य फेरी ) मध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंडने धडक मारली आहे. आता ग्रुप २ मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सेमीफायनलच्या रेसमध्ये आघाडी घेतली आहे. रविवारी ( दि. ६ ) ग्रुप २ मधील तीन सामने हाेणार आहेत. ( T20 WC semi-final) बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात भारताने ५ धावांनी विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानचा सेमीफायनल पर्यंत पाेहचण्याचा प्रवास अधिक खडतर झाला आहे. मात्र, या संघाच्या सेमी फायनलमध्ये पोहचण्याच्या आशा जिवंत आहेत.भारत आणि द. आफ्रिका अआघाडीवर असले तरी 'जर-तर'चे गणित पाकिस्तानचा या स्पर्धेतील पुढील प्रवास ठरविणार आहे. जाणून घेवूया ग्रुप २ मधील सेमी फायनलचे 'गणित'…
टी-२० विश्वचषकात रविवारी ( दि. ६ ) भारत वि. झिम्बाव्वे असा सामना रंगणार आहे. या सामन्याकडे पाकिस्तानचे विशेष लक्ष असणार आहे. कारण भारताचा या सामन्यात पराभव व्हावा, असे दिवास्वप्न पाकिस्तानचा संघ पाहत आहे. उद्या झिम्बाव्वेने भारताचा पराभव केल्यास पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये जाण्याची आशा आहेत. (IND vs ZIM T20)
रविवारी पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश ( सकाळी ९.३० वा.) , भारत वि. झिम्बाब्वे ( दुपारी १.३० वा.) द. आफ्रिका वि. नेदरलँड ( ४.३० वा.) असे सामने हाोणार आहेत. अंकतालिकेत भारत प्रथम स्थानावर असून टीम इंडियाच्या नावावर ६ अंक आहेत. द. आफ्रिकेच्या नावावर ५ गुणांनी दुसरा तर पाकिस्तान ४ अंक पटकावत तिसऱ्या स्थानावर आहे. (IND vs ZIM T20)
टी-२० विश्वचषकात रविवारी भारताचा सामना झिम्बाब्वे विरुद्ध असणार आहे. भारताने हा सामना जिंकला तरच सेमीफायनलचे तिकीट पक्के होणार आहे. भारताच्या खात्यात ६ अंक आहेत. पाकिस्तान आणि बांग्लादेशही जास्तीस जास्त ६ अंकापर्यंत पोहचू शकतात. पाकिस्तानचा रनरेट भारतापेक्षा जास्त आहे. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धचा सामन्यात भारताला विजय मिळवणे आवश्यक झाले आहे. तसेच पावसामुळे हा सामना वाया गेला तरी भारताला एक गुण मिळणार असून, भारताचे गुण सात हाेतील आणि भारत सहज सेमी फायनलमध्ये धडक मारेल.
दक्षिण आफ्रिकेला सेमी फायलमध्ये जागा पक्की करण्यासाठी नेदरलँडविरुद्ध विजय मिळवणे आवश्यक झाले आहे. पराभव झाल्यास आफ्रिकेचा संघ विश्वचषकातून बाहेर पडू शकतो. (IND vs ZIM T20)
पाकने बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात विजय मिळवला आणि झिम्बाब्वेविरूद्ध भारताचा पराभव झाल्यास पाकिस्तान सेमीफायनलमध्ये धडक मारू शकतो. भारत वि. झिम्बाब्वे हा सामना रद्द झाला तरीही भारताचे ७ गुण होतील. आणि पाकिस्तानने दोन सामन्यांत विजय मिळवूनही ६ गुणांवर समाधान मानावे लागेल. (IND vs ZIM T20). तसेच दक्षिण आफ्रिकेचा रनरेट चांगला असल्याने याचा फायदा त्यांना मिळेल.