शिक्रापूर, पुढारी वृत्तसेवा: भाई हिराचंद रायसोनी संस्थेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याला शिक्रापूर येथे दाखल असलेल्या एका गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. जळगाव जिल्ह्यातील गुन्ह्यात येरवडा कारागृहातून कंडारे याला ठेवण्यात आले होते. जामिनावर मुक्तता होण्याआधी जितेंद्र कंडारे याला पोलिसांनी येरवडा कारागृहातून अटक केली. कंडारे याला न्यायलायाने 29 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरज बनगर यांनी दिली.
संतोष काशीनाथ कांबळे (रा. लोहगाव, पुणे) यांनी याबाबत २५ नोव्हेंबर २०२० रोजी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली होती. कांबळे यांचे वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी पैसे कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील बीएचआरच्या पतसंस्थेत गुंतवले होते. मुदतपूर्तीनंतर सुमारे १८ लाख रुपये काढण्यासाठी गेले असता बीएचआर संस्था बंद पडल्याचे समजले. यानंतर कांबळे हे जळगाव येथे मुख्य शाखेत गेले असता करांडे यांनी केंद्र सरकारने मला नेमले असून कागदपत्रे सही करा, तुम्हांला वीस टक्के रक्कम देऊ आणि उर्वरित ८० टक्के रक्कम बाबत विचारांना केली असता कंडारे यांनी धमकी दिली होती.