पुढारी ऑनलाईन डेस्क: देशातील सहा राज्यांमधील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत 'इंडिया' आघाडीने 'एनडीए'पेक्षा जास्त जागा जिंकल्या. 'लोकांनी हुकूमशाही सरकारला नाकारले' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. त्यांनी सर्व मतदारांचे आभार देखील मानले आहेत. (Supriya Sule)
लोकांनी महागाई आणि बेरोजगारी नाकारत, हुकूमशहा सरकारला देखील नाकारले आहे, असे खासदार सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. देशातील सहा राज्यांमधील पोटनिवडणूकीत भाजपविरोधी 'इंडिया' आघाडीतील मित्र पक्षांनी चार ठिकाणी विजय मिळवला आहे. यामध्ये उत्तर प्रदेश (घोसी), केरळ ( पुथुप्पल्ली ), पश्चिम बंगाल ( धुपगुरी ), झारखंड (डुमरी) या मतदारसंघांचा समावेश आहे. तर भाजपने त्रिपुरा आणि उत्तराखंड राज्यांमधील तीन मतदारसंघांमध्ये बाजी मारली आहे. (Supriya Sule)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निवडणूक आयोगाच्या आलेल्या नोटीसीवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, " निवडणुक आयोगाकडून नोटीसमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आले होते, आम्ही त्याची प्रामाणिक उत्तरे दिली आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की, आम्हालाच न्याय मिळेल."
मराठा आरक्षण आणि आगामी ओबीसी आंदोलनावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'मी लातूरमध्ये म्हणाले हाेते की, महाराष्ट्र सरकारनेही दुष्काळ, मराठा आरक्षण, महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, याबाबत काय झाले? असा प्रश्न देखील त्यांनी केला. जालन्यात जी घडलेली घटना घडली ती अमानुष होती. सरकारने जनतेच्या वेदना समजून घ्याव्या, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केली आहे.