पुढारी ऑनलाईन : आज नव्याने विस्तारित झालेल्या शिंदे-भाजप सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा होती; पण मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश करण्यात आलेला नाही. या सरकारची ही कृती म्हणजे राज्याच्या स्त्री शक्तीवर हा अन्याय आहे, असे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या एका ट्विटची आठवण करून दिली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, "स्वतः पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ 'होम मेकर' असू नयेत तर त्या 'नेशन बिल्डर' असाव्यात असं ते सांगतात, मग शिंदे-फडणवीस सरकारमध्ये महिलांना काहीच स्थान का नाही असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
उशीरा का होईना मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला आणि राज्याला मंत्री मिळाले ही आनंदाची बाब असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पुढे त्या म्हणाल्या, संजय राठोड यांना केलं याचा मला मनापासून आनंद आहे. त्यांच्यावर अन्याय होत होता. भाजप कोणावरही बेभानपणे टीका करत राहते. राठोड यांच्या कुटूंबाचाही त्यांनी विचार केला नाही. त्या प्रकरणाशी राठोडांचा काही संबंध होता असे मला तरी वाटत नाही, असेही त्या म्हणाल्या.