वन अविघ्न पार्क इमारत दुर्घटनेची मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी गंभीर दखल घेतली आहे. घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोरात-कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
शुक्रवारी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास करी रोड येथील वन अविघ्न पार्क इमारतीमधील १९ व्या मजल्याला आग लागली. स्वत:चा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या अरुण तिवारी नामक एका व्यक्तीने इमारतीच्या १९ व्या मजल्यावरुन उडी घेतल्याने त्याला प्राणाला मुकावे लागले.
मंत्री शेख म्हणाले की, प्रत्येक इमारत प्रशासनाला यापुढे अग्नी सुरक्षा अहवाल दर सहा महिन्यांनी पालिकेला सादर करणं अनिवार्य करण्यात येणार आहे. तसेच उंच इमारतीमधील सुरक्षा रक्षकांना देखील अग्नी सुरक्षाविषय प्रशिक्षण घेणं अनिवार्य करण्यात येणार आहे.
इमारतींमधील अग्नीसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याच्यादृष्टीने अग्नीशमन विभाग व संबधित अन्य विभागांसोबत लवकरच बैठक घेणार असल्याचे मंत्री शेख यांनी शेवटी सांगितले.
मुंबईतील लालबागमधील वन अविघ्न टॉवरला आग भीषण आग लागली आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
आगीचे लाळ पसरल्याने घाबरलेल्या सुरक्षा रक्षकाने १९ व्या मजल्याच्या गॅलरीतून उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाला.
१९ व्या मजल्यावरील एका फ्लॅटचे नुतनीकरण सुरू असताना ही आग लागल्याचे समजते. ही आग आटोक्यात आणली जात आहे. या टॉवरच्या नवव्या मजल्यापर्यंत पार्किंग सुविधा आहे. १० व्या मजल्यापासून रहिवाशी फ्लॅट आहेत.
करीरोड स्टेशनच्या बाजुला असलेल्या या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर आग लागली होती. ती आग २५ व्या मजल्यापर्यंत पसरली आहे. या आगीतून जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु आहे. यात एका नागरिकाने इमारतीवरुन उडी मारल्याचे समोर आले आहे. अग्निशमन दलाला लेव्हल तीनचा कॉल देण्यात आला आहे.